वेब टीम : मुंबई सध्याच्या राजकीय घडामोडीचे चित्र पाहाता, या पक्षातून त्या पक्षात जाण्याचे जाहीर प्रवेश जोरात सुरु झाले आहेत. परंतु हे भ...
वेब टीम : मुंबई
सध्याच्या राजकीय घडामोडीचे चित्र पाहाता, या पक्षातून त्या पक्षात जाण्याचे जाहीर प्रवेश जोरात सुरु झाले आहेत. परंतु हे भाविष्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या माध्यमातून भाजपाला शह देण्याची व्यहूरचना आखली जात आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ‘भाजपा’ चा काटा अशी मसालेदार चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहिर यांनी गुरुवारी हाती शिवबंधन बांधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या सेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठाच झटका बसला आहे.
मातोश्री निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अहीर यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी वरळी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व इतर अहीर यांचे पाठिराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मला फोडलेली माणसं नको आहेत. मला मनाने जिंकलेली माणसे हवी आहेत. शिवसेनेची ताकद वाढत आहे. ही केवळ शिवसेनेची नाही तर मराठी माणसाची आणि हिंदूंची सुद्धा ताकद वाढत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रवेशावेळी म्हणाले.
नेत्याला पक्षात घेताना सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतो. राजकारण हे राजकारणासारखेच करायचे असते. पण काही गोष्टींचे तारतम्य बाळगायचे असते. पक्ष फोडण्याचे काम आम्ही कधी केले नाही. आम्हाला फोडलेली माणसे नकोत. मनाने जिंकलेली माणसे हवी आहेत, असे उद्धव ठाकरे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात म्हणाले.
यानंतर कदाचित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे काही अपवाद पदाधिकारी, आमदारही शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिवसेनेत प्रवेश करून सेनेची ताकद वाढवायाची. यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून भविष्यात भाजपालाच खिंडत पकडण्याचा डाव राष्ट्रवादीचा असू शकतो, अशी मसलेदार चर्चा सध्या राजकीय वर्तृळात चांगली रंगू लागली आहे.
COMMENTS