वेब टीम : कालका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला चांगलेच झापले आहे. आता चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) असेल...
वेब टीम : कालका
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला चांगलेच झापले आहे. आता चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) असेल अशी आक्रमक भूमिका राजनाथ सिंह यांनी घेतली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हरियाणातील कालका येथे एका सभेत बोलताना पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला. ते म्हणाले की, कलम 370 रद्द करणे आमच्या एका शेजाऱ्याला चांगलेच झोंबले. आता त्यांची तब्येत बिघडली असून तो वरचेवर दुबळा होत चालला आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी जगभरातील देशांच्या दारात जाऊन उभा राहत आहे.
आता आम्ही असा काय गुन्हा केला? ज्यामुळे ते आम्हाला सारख्या धमक्या देत आहेत. परंतु, जगातील सर्वात शक्तिशाली मानला जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनीही सांगितले की जावा, भारताबरोबर बसून चर्चा करा, इकडे येण्याची गरज नाही. भारतीयांना विश्वास देऊ इच्छितो की, सरकार राहिल अथवा जाईल परंतु, भारत मातेचे मस्तक झुकू देणार नाही.
पाकिस्तानातील लोक म्हणतात की दोन्ही देशांत चर्चा झाली पाहिजे. पण कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. कोणता मुद्दा आहे? का चर्चा झाली पाहिजे? आता पाकिस्तानबरोबर तेव्हाच चर्चा होईल जेव्हा ते त्यांच्या भूमीवरून दहशतवाद संपवतील. जर तसे होणार नसेल तर त्यांच्याशी चर्चेचे काहीही कारण नाही. आणि पुढेही चर्चा झालीच तर ती पाकव्याप्त काश्मीरबाबतच होईल. दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यावर होणार नाही.
देशाच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. जे आम्ही आमच्या निवडणूक घोषणापत्रात दिले होते. त्याचे आम्ही पालन करत आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 होते. भारत स्वतंत्र झाला होता मात्र देशात 2 संविधान आणि दोन ध्वज (निशाण) होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता हे चालणार नाही आणि एका चुटकीसरशी आम्ही ते काढून टाकले. लोक म्हणत होते की, कलम 370 ला हात घातला तर देशाचे दोन तुकडे होतील. लोक हेही म्हणत होते की असे झाले तर भाजप पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही.
परंतु, मी सांगू इच्छितो की, आमचा पक्ष केवळ सरकार बनवण्यासाठी राजकारण करत नाही तर देश बनवण्यासाठी राजकारण करतो, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
COMMENTS