वेब टीम : कोल्हापूर राहत्या घरात गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री हातकण...
वेब टीम : कोल्हापूर
राहत्या घरात गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी गावात कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. या भावांकडून ६९ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचे उजळाईवाडी येथील स्फोटाशी कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विलास राजाराम जाधव (वय ५२ ) व आनंदा राजाराम जाधव (५४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात ट्रकचालक दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोधक-नाशक पथक, विशेष तपास पथक (एसआयटी) आणि स्थानिक पोलिसांची पथके जागोजागी तैनात केली होती.
उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष माने, हरिश पाटील यांना माले मुडशिंगी गावात दोन भाऊ गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून छापा टाकण्याचे आदेश दिले.
या दोघांच्या घरावर छापा टाकला असता बॉम्ब बनवण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ तयार गावठी बॉम्ब असा ७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
COMMENTS