वेब टीम : अहमदनगर श्रीगोंदा मतदारसंघात सरासरी 67.66 टक्के मतदान झाले असले तरी आता आमदार दादा होणार की अण्णा यावर चर्चा सुरू झाली आहे. ...
वेब टीम : अहमदनगर
श्रीगोंदा मतदारसंघात सरासरी 67.66 टक्के मतदान झाले असले तरी आता आमदार दादा होणार की अण्णा यावर चर्चा सुरू झाली आहे.
कोणत्या गावात कुणाला लीड मिळणार यावर कार्यकर्ते आपल्या नेत्याचे आमदार होण्याचे गणित करत असल्याने आता निकालाच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते आहेत.
मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक लढणार नाही असे घोषित केले. भाजपने मात्र माजी मंत्री बबनराव पाचपुते याना मैदानात उतरवले.
नागवडे, जगताप यांचे एकमत झाले नाही. विधानसभेचे राष्ट्रवादी चे तिकिट घनश्याम शेलार याना मिळाले. नागवडे भाजपवासी झाले. पाचपुते अणि नागवडे यांनी मांडीला मांडी लावून सभा घेतल्या.
पाचपुते यांनी निवडणूक एकतर्फी होईल असे गृहीत धरले; मात्र निवडणुकीत हळू हळू रंग भरत गेला आणि खासदार शरद पवार यांच्या सभेनंतर वातावरण बदलून गेले.
पाचपुते यांनी पुन्हा यंत्रणा कामाला लावत गावोगाव कार्यकर्ते जागृत केले.मतांचा टक्का वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले.
पाचपुते साठी वाळकी गटात शिवसेनेची मदत तर चिंचोडी पाटील गटात आमदार कर्डिले यांची मदत महत्वाची होती. तर शेलार यांनीही माजी खासदार दादा पाटील यांच्यासह नातेगोते यांच्यावर भिस्त ठेवली होती.
चिंचोडी मध्ये भाजपला लीड मिळेल तर वाळकी मध्ये राष्ट्रवादी ला अधिक मते मिळतील असे गृहीत धरताना मांडवगण गटात राष्ट्रवादीचे नेते सचिन जगताप यांच्याच बरोबर शेलार यांचे जुने ऋणानुबंध आहेत.
त्यामुळे मते वाढवणार की पाचपुते साठी त्यांचे जुने कार्यकर्ते पुन्हा बेरीज जुळवणार हे महत्त्वाचे आहे. कोळगाव गट भाजपकडे आहे. इथे शेलारांनी आपल्याला अधिक मते मिळतील अशी आशा बाळगली आहे.
आमदार राहुल जगताप यांचे या गटातील वजन कामाला येते की दिनकर पंधरकर आणि पंचायत समितीचे माजी सभापती भैया लगड आणि कमीअधिक विखे समर्थकांचा रेटा इथे पाचपुतेची बेरीज वाढविण्यासाठी मदत करतात हा विषय आहे.
शेजारी येळपणे गटात राष्ट्रवादी सदस्य असले तरी ते पाचपुतेंची बाजू सावरत होते. या गटात शेलारांचा नातेसंबंध आहे. तिथे अनिल वीर यांनी शेलरांची बाजू सावरली पण जिल्हा परिषद सदस्य पती महेंद्र वाखारे विखे आदेश मानत पाचपुतेसाठी काम करत असताना सतीश धावडे आणि संदीप पवार यांनी कार्यकर्त्यांची फळी बांधत सदाशिव पाचपुतेंच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते साठी काम केले.
बेलवंडी गटात काँगेसच्या महिला बालकल्याण सभापती सदस्य असल्या तरी राजेंद्र नागवडे भाजपवासी झाले. तर अण्णासाहेब शेलार सक्रिय न होता शांत राहिले. इथेही पाचपुते आणि शेलार यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
काष्टी जिल्हा परिषद गट भाजपकडे आहे. हा गट पाचपुते यांचा बालेकिल्ला असल्याने इथे सर्वाधिक लीड असेल अशी अपेक्षा पाचपुतेची असताना शेलारही भिस्त ठेवून होते ती पाचपुते वर नाराज असलेले कार्यकर्ते यांच्यावर. तसे इथे शेलार यांचे नातेसंबंध देखील अधिक असल्याने घोडचा पट्टा शेलारांची किती मते वाढवणार अशी चर्चा आहे.
आढळगाव गटात भाजपच्या ताब्यात आहे. इथे पाचपुतेंची अधिक लीड घेण्याची अपेक्षा असताना शेलार हे देखील त्यांच्या कुकडीच्या पाण्याचे 35 वर्षांच्या संघर्षाची आठवण करून देत अधिकची बेरीज जुळवत आहेत.
अशा जमेच्या बाजू पाचपुतेंच्या असताना राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांनी जोरदार टक्कर देत तालुक्यात आज पर्यँत केलेले काम आणी कुकडीच्या पाण्यासाठी केलेला संघर्ष आणि पवार साहेबांची झालेली जोरदार सभा, आमदार राहुल जगताप यांनी लढवलेली खिंड यावर विजयाचे गणित गृहीत धरत आहेत. आता निकालाच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते आहेत.
COMMENTS