वेब टीम : अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’ असे...
वेब टीम : अहमदनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’ असे वक्तव्य नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी कर्जत येथील प्रचारसभेत केले.
या वक्तव्याने खासदार सुजय विखे पाटील चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जतमध्ये शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विखे यांनी हे वक्तव्य केले.
विखे म्हणाले, ‘पालकमंत्र्यांनी त्यांच्या सभेला (म्हणजे विरोधी उमेदवार रोहित पवार) जाणाऱ्या लोकांची यादी काढावी.
त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत.
मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको. तुम्हाला जर कमळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील.’
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
त्याचा पहिला हप्ता म्हणून अलीकडेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्याकडे विखे यांचा रोख होता.
COMMENTS