वेब टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदारांसह पराभूत झालेल्या च...
वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदारांसह पराभूत झालेल्या चारही उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (दि.२६) रात्री मुंबईत भेट घेतली.
यावेळी या आमदारांनी जिल्ह्यातील पाडापाडीच्या राजकारणात आमचा बळी गेला आहे. 12 विरुद्ध 0 अशी घोषणा विखे पाटलांनी केली होती.
ही घोषणाही फोल ठरली आहे. त्यामुळे विखेंना मंत्रीपद देऊ नये, असे साकडे घातल्याचे भाजपातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विखेंच्या मंत्रीपदातील अडचणी वाढणार आहेत.
आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : विखेंसोबतचे मंत्रिपदाचे स्पर्धक पडले : राम शिंदे, कर्डीले, कोल्हे, औटी, मुरकुटे, राठोडांच्या पराभवामागे विखे?
नगर जिल्ह्यातील भाजपच्या पाच उमेदवारांचा पराभव झाला आहे. पराभूत उमेदवारांच्या पराभवाला विखे फॅक्टर कारणीभूत असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
जिल्ह्यातील पाडापाडीच्या राजकारणाला हे सर्व बळी ठरल्याचे बोलले जात आहे. 12 विरुद्ध 0 अशी घोषणा विखे पाटलांनी केली होती. ही घोषणाही फोल ठरली आहे.
त्यामुळे विखेंना मंत्रीपद नको, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान कायम ठेवायचे असेल, तर राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने व राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीत निकालाबाबत मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली?
यंदा विखेंच्या मंत्रिपदाला कात्री लागणार का? मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार? राम शिंदे यांचे पुनर्वसन मुख्यमंत्री करणार का? बबनराव पाचपुतेंना संधी मिळणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
COMMENTS