वेब टीम : पुणे स्थानिक नेत्यांशी कोणतीही चर्चा न कता भाजपने उपमहापौरपद काढून घेतल्यामुळे भाजप आणि आरपीआयमध्ये चांगलीच खडाजंगी सोमवारी प...
वेब टीम : पुणे
स्थानिक नेत्यांशी कोणतीही चर्चा न कता भाजपने उपमहापौरपद काढून घेतल्यामुळे भाजप आणि आरपीआयमध्ये चांगलीच खडाजंगी सोमवारी पहायला मिळाली.
पाच नगरसेवकांना किती पदे द्यायची असा मुद्दा भाजपकडून उपस्थित झाल्यानंतर ‘आमची मते तुम्हाला मिळाली नाहीत का?’ असा प्रश्न आरपीआयने उपस्थित केला आहे.
बैठकीतले वातावरण तापल्याने सत्तेचा हा संघर्ष यापुढेही महापालिकेत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
आरपीआयकडे असलेले उपमहापौरपद भाजपाने काढून घेतल्याने आरपीआयचा संताप झाला. आरपीआय पदाधिकार्यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ आणि आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर यांच्यामध्ये चांगलीच शाब्दीक चकमक उडाली.
संतापलेल्या मिसाळ बैठकीमधून बाहेर पडत असताना त्यांना शांत करुन थांबवण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आरपीआयच्या नेत्यांचे बोलणे झाल्यानंतर वाद निवळला.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयकडे पालिकेचे उपमहापौरपद देण्यात आलेले आहे. परंतू, यावेळी हे पद काढून भाजपकडे घेण्यात आले.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यापुर्वी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी सभागृह नेत्यांच्या कक्षामध्ये भाजप पदाधिकार्यांना भेटायला गेले.
त्यावेळी हे पद भाजपाकडे जाणार असल्याचे सांगण्यात आल्यावर सर्वजण निषेध व्यक्त करीत तेथून बाहेर पडले.
आरपीआयचे नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज झाल्याने त्याचा फटका 22 नोव्हेंबर रोजी होणार्या महापौरपदाच्या निवडणुकीत बसू नये याकरिता त्यांची समजूत काढण्यासाठी खासदार संजय काकडे, शहराध्यक्षा माधुरी मिसाळ हे धेंडे यांच्या कक्षात गेले.
तेथे आरपीआयचे परशुराम वाडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी बोलणे झाले असून आरपीआयच्या नगरसेवकांची संख्या कमी आहे.
त्यांना योग्य ती पदे आणि समित्यांमध्ये सन्मानजनक स्थान दिले जाईल असे आश्वासन दिले. बैठकीमध्ये नाराजी दूर करण्यात आल्यानंतर आरपीआयचे नगरसेवकही महापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी सोबत गेले.
COMMENTS