वेब टीम : रांची छत्तीसगड पोलिसांनी बनावट चकमकीत नक्षलवादी ठरवत १७ गावकऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याचे न्यायालयीन चौकशीत समोर आले. ही ...
वेब टीम : रांची
छत्तीसगड पोलिसांनी बनावट चकमकीत नक्षलवादी ठरवत १७ गावकऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याचे न्यायालयीन चौकशीत समोर आले. ही चकमक २८ जून २०१२ रोजी बिजापूर जिल्ह्यात झाली होती.
न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी केलेल्या न्यायालयीन चौकशीनंतर सादर केलेल्या अहवालातून हे धक्कादायक सत्य समोर आहे. सात वर्षे चाललेली सुनावणी आणि तपासानंतर गेल्या महिन्यात हा अहवाल सादर केला होता.
हा अहवाल रविवारी लीक झाला. त्यानुसार, पोलिसांनी ठार मारलेले लोक नक्षलवादी नव्हते ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षा जवानांनी दिलेल्या माहितीनुसार,सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांना २८ जून २०१२ रोजी काही नक्षलवादी सारकेगुडा येथे रात्री भेटणार असल्याची माहिती मिळाली होती.
सुरक्षा जवानांनी गावकऱ्यांनी आपल्यावर गोळीबार केल्यानेच प्रत्युत्तर देताना आपल्याकडून गोळीबार झाल्याचा दावा केला होता. गावकऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळला होता. मारले गेलेले लोक गावकरी असून गावात होणाऱ्या पारंपारिक उत्सवाबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते,असे सांगितले होते.
अहवालातील माहितीनुसार, गावकऱ्यांनी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा खोटा असून मारले गेलेले लोक नक्षलवादी होते याचा कोणताही पुरावा सुरक्षा यंत्रणा सादर करु शकलेली नाही.या हत्येनंतर चकमकीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले होते.
यानंतर तत्कालीन भाजप सरकारने एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोगाची नेमणूक केली होती. आयोगाने १७ ऑक्टोबर रोजी आपला अहवाल सादर केला.हा अहवाल छत्तीसगड कॅबिनेटसमोर सादर केला.
यानंतर तो विधानसभेतही मांडला. पोलीस तपासात बऱ्याच त्रुटी असून त्यात फेरफार केल्याचे आयोगाने अहवालात म्हटले. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्र,पॅलेट्स जप्त केल्याचा दावाही फेटाळला आहे.
COMMENTS