वेब टीम : मुंबई मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केवि...
वेब टीम : मुंबई
मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीचा आवाज अजिबात केविलवाणा नसल्याचे आणि मराठीचा स्वाभिमान टिकविण्याचे काम आपणा सर्वांचे आहे असे स्पष्ट केले. एवढेच नाही तर मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वासही व्यक्त केला.
राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात 'इये मराठीचिये नगरी' या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, साहित्यिका नीलिमा गुंडी यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, विधानमंडळ सदस्य आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
मराठीचा आग्रह एक दिवसासाठी, एका वर्षासाठी नाही तर संपूर्ण आयुष्य मराठी, मराठी आणि मराठीच झालं पाहिजे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले ‘बये दार उघड’ असं सांगणारी भाषा मराठीच, प्रत्येक संकटात धावून येणारी मराठीच, मुगल आणि इंग्रजांना पुरुन उलेली भाषा आपली मराठीच आहे. त्यामुळे मराठी टिकेल की नाही याची चिंता नको.
आज आपल्या 'आई'चा सन्मान
आज आपण सर्व मिळून आपल्या आईचा सन्मान करत असल्याची भावना व्यक्त करून श्री. ठाकरे म्हणाले, मराठी ही ह्दयावर, डोंगर कपारीत कोरली गेलेली भाषा आहे, आपण बोलत राहिलो तरी ती पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित होत जाईल. आपल्या भाषेचा एकच दिवस का साजरा करायचा, बरं करायचा तर मराठी भाषा टिकेल की नाही ही चिंता मनात बाळगून तो का साजरा करायचा ?
मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा
जगभरात साहित्य संमेलन, महोत्सवाच्या माध्यमातून मराठीचा जागर होत असताना मराठीची, मराठी संस्कृतीची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा आहे. तिचा अभिमान, स्वाभिमान टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचंच आहे. वासुदेव, नंदीबैलवाले, वाघ्या मुरळी या मराठीच्या सांस्कृतिक परंपरा पुढच्या पिढीला माहितीच नाहीत. मग मराठी भाषा पुढं जाणार कशी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निकष आणि पुरावे मागितले जातात. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मराठी भाषेचा पुरावा मागणारे जिवंत असते का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मराठी भाषा अनिवार्य कायद्याचा आनंद
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा करण्याचं भाग्य मला मिळालं, याचा आनंद वाटत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद
मुख्यमंत्री सभागृहात भाषण करत असताना सभागृहाच्या गॅलरीत संत टेरेसा विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व चिमण्या पाहुण्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांना थेट संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या शाळेचे नाव विचारले. आज मला माझ्या आईची आठवण येते, तिने मला दगडी पाटीवर पेन्सिलने अ,आ,इ लिहायला शिकवले, तुमच्यापैकी कितीजणांना ही पाटी पेन्सिल माहित आहे असं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारताच हो माहिती आहे, असे जल्लोषपूर्ण उत्तर विद्यार्थ्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांकडून आजोबांचे स्मरण
आताचा माणूस मोबाईलवेडा झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मोबाईलमुळे लिहिणे, वाचणे बंद झाले. ऱ्हस्व, दीर्घ गेले. मराठी भाषा शुद्ध लिहिली गेली पाहिजे, ऱ्हस्व दीर्घाप्रमाणे भाषेचा उच्चार झाला पाहिजे हा आपल्या आजोबांचा प्रबोधनकार ठाकरे यांचा आग्रह होता असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
COMMENTS