वेब टीम : मुंबई संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणां...
वेब टीम : मुंबई
संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्याला पाठिशी उभे आहे.
मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जाऊ, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.
‘ऑल इंडिया सारस्वत कल्चरल’ संघटनेच्या वतीने आयोजित ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील वेबिनारमध्ये ना. देसाई बोलत होते.
यावेळी संघटनेचे अजित गुंजीकर, किशोर मासूरकर, नरेंद्र वझे, स्मिती गवाणकर आदी उपस्थित होते.
सध्या संपूर्ण जग एका वेगळ्या संकटाला तोंड देत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.
परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन व उद्योग विभाग सज्ज झाला आहे.
संकटासोबत संधी मिळते हे हेरून उद्योग विभागाने विविध धोरणं आणि योजना आखल्या आहेत.
त्याचा मराठी माणसांनी फायदा घ्यावा व महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन ना. देसाई यांनी केले.
कोरोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी भूखंड, रस्ते आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
एमआयडीसीने या आणि उद्योग सुरू करा, ही संकल्पना राबविण्यासाठी नवीन उद्योगांसाठी तयार शेड तयार करण्याचाही निर्णय़ घेतला आहे.
गुंतवणुकदार यंत्र-सामुग्री आणून थेट उत्पादन सुरू करू शकतील.
याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना पद्धत सुरू केली आहे.
शिवाय मोठ्या गुंतवणुकदारांसाठी उद्योगमित्र संकल्पना हाती घेतली आहे.
उद्योग विभागाचा एक अधिकारी त्या गुंतवणुकदारांसोबत पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू होईपर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे.
आता गुंतवणुकदारांनी पुढे यावे आणि उद्योग सुरू करावेत, असे आवाहन ना. देसाई यांनी केले.
उद्योगांत कामगारांची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी ‘कामगार विनिमय ब्युरो’ स्थापन केला जाणार आहे.
यावर लवकरच बैठक होईल. कामगारांची नोंदणी करून गरजेनुसार उद्योगांना कामगारांचा पुरवठा केला जाईल.
यावेळी अल्पकालिन प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात येईल.
महाराष्ट्रात कामगारांची टंचाई भासणार नाही, याची शासन काळजी घेत आहे.
याशिवाय असंघटीत क्षेत्र व कामगारांना शासन मदत करण्यास तयार आहे.
COMMENTS