वेब टीम : दिल्ली पूर्व लडाखमधील भारत-चीन तणावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला. गलवानमध्ये चिनी सैनिकां...
वेब टीम : दिल्ली
पूर्व लडाखमधील भारत-चीन तणावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला. गलवानमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले.
तणाव अधिक वाढल्याने पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. चीनने ना भारताच्या जमिनीवर आणि ना कुठल्या पोस्टवर कब्जा केलाय, असे पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते.
पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीतील वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी पुन्हा ट्विट करून सरकारला प्रश्न केला आहे.
‘भारताच्या सीमेत कुणी घुसले नाही आणि कुणी कब्जाही केला नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण पँगोंग लेकजवळ भारत मातेच्या पवित्र भूमीवर चीनने कब्जा केल्याचे उपग्रहाच्या फोटोंवरून स्पष्ट होत आहे’, असे राहुल गांधी म्हणाले.
खरंतर नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी याआधी केली होती. जपान टाइम्समधील एक लेख शेअर करत राहुल गांधींनी ही टीका केली होती. भारताचे सध्याचे धोरण हे चीनसमोर झुकणारे असल्याचे जपान टाइम्समधील लेखात म्हटले होते.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय सीमेत कुणी घुसखोरी केली नाही आणि कुणी जमिनीवर कब्जाही केला नाही असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत.
आम्ही भारतीय सीमेत घुसखोरी केली नाही हीच गोष्ट चीनही सांगत आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप सिब्बल यांनी केलाय.
चिनी सैनिकांनी घुसखोरी केली नाही आणि भारताच्या सीमेत कुणी आलं नाही तर लडाखमध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान कसे काय हुतात्मा झाले? असा प्रश्न सिब्बल यांनी केला. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य हे परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या उलट आहे, असे सिब्बल म्हणाले.
COMMENTS