वेब टीम : मुंबई 72 दिवसांच्या लॉक डाऊनचा पंचनामाही काही प्रमुख मंडळींनी सुरू केला आहे. लॉक डाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव...
वेब टीम : मुंबई
72 दिवसांच्या लॉक डाऊनचा पंचनामाही काही प्रमुख मंडळींनी सुरू केला आहे. लॉक डाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आधीच सांगितले.
राहुल गांधी यांनीही नेमके तेच सांगितले व आता राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी जी खुली चर्चा केली त्यातून लॉक डाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे.
मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीने लॉक डाऊन लागू केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तर रोखला गेला नाहीच, पण अर्थव्यवस्था मात्र साफ उद्ध्वस्त झाली. असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला लगावण्यात आला आहे.
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात...
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ कसा वाजला आहे हे राजीव बजाज यांनी सांगितले. राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत.
राजीव बजाज यांचे पिताश्री राहुल बजाज हे तोंडफाट सत्य बोलण्याबद्दल प्रख्यात आहेत. चमचेगिरीशी त्यांचा कधी संबंध आल्याची नोंद नाही. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे.
मोठ्या वादळानंतर पडझडीचा अंदाज घेतला जातो. पंचनामे वगैरे केले जातात. तसे पंचनामे आता लॉक डाऊननंतरच्या पडझडीबाबत केले जात आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘पुन:श्च हरिओम’चा नारा दिला. त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत, पण 72 दिवसांच्या लॉक डाऊनचा पंचनामाही काही प्रमुख मंडळींनी सुरू केला आहे. लॉक डाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आधीच सांगितले. राहुल गांधी यांनीही नेमके तेच सांगितले व आता राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी जी खुली चर्चा केली त्यातून लॉक डाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे. मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीने लॉक डाऊन लागू केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तर रोखला गेला नाहीच, पण अर्थव्यवस्था मात्र साफ उद्ध्वस्त झाली. राजीव बजाज यांनी काहीच नवे सांगितले नाही. देशातील अनेक उद्योजक, व्यापारी व नोकरदार वर्गास नेमके हेच सांगायचे होते, पण अनामिक भीतीने त्यांनी गप्प राहणे पसंत केले. राजीव बजाज यांनी त्यांचे मत परखडपणे मांडले आहे. बजाज यांनी लॉक डाऊनसंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली.
त्याबद्दल त्यांना ‘ट्रोल’ केले जाईल, देशविरोधी ठरवले जाईल, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील बजाज कुटुंबाचे योगदान व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेस ताकद देण्याची त्यांची धडपड देशाला माहीत आहे. त्यामुळे इतरांवर चालवले जाणारे ‘हातखंडे’ बजाज यांच्याबाबतीत चालणार नाहीत. बजाज यांनी देशाच्याअर्थव्यवस्थेबाबत जे मुद्दे मांडले ते खोडून काढण्याची हिम्मत सरकारने दाखवायला हवी. राजीव बजाज यांनी जे मुद्दे मांडले ते असे.
– लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील लोक काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे.
– जपान, अमेरिका या देशांमध्ये प्रतिव्यक्ती एक हजार डॉलरची थेट मदत दिली गेली. हा पैसा प्रोत्साहन निधी नव्हता. तिथे सरकारने दिलेल्या मदतीतून संस्था, संघटना व नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. हे प्रमाण हिंदुस्थानात जेमतेम १० टक्के आहे.
– हिंदुस्थानसारखा लॉक डाऊन दुसरा कोठेच नाही. आपण जपान आणि स्वीडनसारखे धोरण राबवायला हवे होते. तिथे नियमांचे पालन होत आहे. मात्र लोकांना त्रास होत नाही. आपल्याकडे लोकांना कोरोना कॅन्सरसारखा वाटू लागला. आपण सत्य सांगण्यास कमी पडलो आहोत.
– लॉक डाऊन उठवल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे अशी परिस्थिती असणारा हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा होतो तिथेच आलो आहोत.
– हिंदुस्थानातील टाळेबंदी राक्षसी पद्धतीचीच आहे. जागतिक युद्धातही अशी टाळेबंदी नव्हती. कोरोनाबद्दलचे लोकांच्या मनातील भय काढून टाकून त्यांना ठोस दिशा देण्याची गरज आहे. हे काम फक्त पंतप्रधानच करू शकतात.
श्री. राजीव बजाज यांनी ही जी मते मांडली आहेत त्यात देशविरोधी असे काय आहे? राजीव बजाज हे वाहन उद्योग क्षेत्रातील मोठे नाव आहे. सध्याच्या अस्थिर अर्थव्यवस्थेचा फटका या उद्योगास बसेल हे नक्की, पण फक्त ‘लॉक डाऊन’ उठवून लोकांना कामधंद्याला लावायचे हाच त्यावरचा उपाय असू शकत नाही. कोरोनाचा वेग थांबविण्याचा ‘लॉक डाऊन’ हा एक उपाय होता आणि जगभरात तोच उपाय अवलंबण्यात आला. बजाज यांनी वाहनांचे उत्पादन बाजूला ठेवून कोरोनावर लस शोधली तरच काही चांगले घडेल. अन्यथा आज आहे तोच ‘लॉक डाऊन’ हळूहळू उठविणे हाच उपाय आहे. ‘लॉक डाऊन’ करताना ‘नोटबंदी’ प्रमाणे नियोजन नव्हते यावर चर्चा होऊ शकेल. टाळेबंदी केली नसती तर विषाणू जास्त पसरला असता. रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढला असता हे खरे, पण नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतेही नियोजन नव्हते. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे. अशाप्रसंगी निर्णय एकांगी घेऊन चालत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन पावले टाकावी लागतात. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत ‘धक्का’ द्यायचाच म्हणून काँग्रेसचे आमदार विकत घ्यायचे किंवा फोडायचे, मध्य प्रदेशात ठरवून सरकार पाडायचे आणि यासाठी जसे नियोजन केले जाते तसे काटेकोर नियोजन टाळेबंदीबाबतही करणे गरजेचे होते.
येथे देशाच्या भवितव्याचाच प्रश्न आहे. सरकारने २० लाख कोटीचे पॅकेज दिले, पण निसर्ग वादळाप्रमाणे ते पॅकेज घोंघावत आले व गेले. बजाज यांनी नेमके हेच सांगितले आहे. लोकांना थेट मदत करा असे राहुल गांधी, रघुराम राजन व आता राजीव बजाज यांनीही सांगितले आहे, पण नियोजन व दिशा नाही. हे नियोजन आता प. बंगाल व बिहार विधानसभेच्या निवडणुकांत दिसून येईल. अर्थव्यवस्थेस दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ कसा वाजला आहे हे राजीव बजाज यांनी सांगितले. हे सर्वस्वी त्यांचे मत आहे. सरकारच्या धोरणांवर टीका कराल तर अडचणीत याल असा सल्ला बजाज यांना देण्यात आला होता, पण ऐकतील ते बजाज कसले? राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. सरकारचे उंबरठे झिजवून कंत्राटे मिळविणारे, बँकांची कर्जे बुडवून श्रीमंतीचा थाट मिरवणाऱ्यांपैकी ते नाहीत. राजीव बजाज यांचे पिताश्री राहुल बजाज हे तोंडफाट सत्य बोलण्याबद्दल प्रख्यात आहेत. चमचेगिरीशी त्यांचा कधी संबंध आल्याची नोंद नाही. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे. अर्थव्यवस्थेची दशा काय ते यानिमित्ताने दिसले. देशाने राहुल गांधी यांचेही आभार मानलेच पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टाळेबंदीत गांधी यांनी अनेकांना बोलते केले. यानिमित्ताने मतमतांतरे कळतात इतकेच.
COMMENTS