वेब टीम : अहमदनगर नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराजांना अयोध्या ये...
वेब टीम : अहमदनगर
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराजांना अयोध्या येथे 5 ऑगस्ट रोजी होणार्या श्रीराम जन्मभूमी नियोजित मंदिराच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमाचे निमंत्रण आले असून 3 ऑगस्टला ते अयोध्येला रवाना होणार आहे.
श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या वतीने हे विशेष निमंत्रण गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना देण्यात आले आहे.
गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते अनेक वर्षाच्या संघर्षानंतर श्री राम जन्मभूमीच्या नियोजित मंदिराचा भूमिपूजन व न्यास पूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व देशातील प्रमुख संत महंतांच्या हस्ते हा सोहळा होत आहे.
या कार्यक्रमासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या स्ट्रस्टच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना त्यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र कारसेवा समितीचे प्रमुख या नात्याने निमंत्रण देण्यात आलेले असल्याने भक्त परिवारातही उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातून श्री राम जन्मभूमी न्यासाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य असलेले महंत गोविंददेवगिरी महाराज व्यास यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांना निमंत्रित करण्यात आले असल्याने महाराष्ट्रातील भक्त परिवारासह श्रीराम भक्तांकडून ही आनंद व्यक्त केला जात आहे.
सोमवारी दि.3 ऑगस्ट रोजी गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे अयोध्येला रवाना होणार असून त्यांच्या समवेत विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री अॅड.सुनील चावरे हे देखील अयोध्येला रवाना होणार आहे.
प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन व न्यास पूजनाचा सोहळा दि.5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत महंतांच्या उपस्थितीत साजरा होत असून या दिवशी सर्वांनी घरातच राहून हा उत्सव गुढ्या ध्वज उभारून सुरक्षित अंतर ठेवून साजरा करावा असे आवाहन श्री क्षेत्र देवगडचे महंत व विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी देशासह राज्यातील जनतेला केले आहे.
व्हिडीओद्वारे भक्तांशी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की, राम मंदिराचे 5 ऑगस्टला भूमिपूजन होत आहे.
गेल्या पाचशे वर्षांपासून आपण या आनंदमय सोहळयाची वाट पहात होतो तो सुवर्णदिवस या दिवशी उगवत आहे, कोरोना महामारीच्या भयाण संकटामध्ये सर्वांना तेथे जाणे शक्य नाही मात्र दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्वांनी गुढ्या तोरणे ध्वज उभारून रांगोळी घालून हा आनंदोत्सव साजरा करावा
पाटावर प्रभू रामचंद्र भगवंताची प्रतिमा ठेऊन मनोभावे पूजा करावी घराबाहेर रांगोळी काढून पंचारतीने आरती गाऊन घरच्या घराचा उत्सव साजरा करावा चार ते पाच मंडळींनी सामाजिक अंतराचे पालन करत भजने गावीत.
प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत आपल्याला न्यास पूजन व मंदिर निर्मितीचे भूमिपूजन पहावयास मिळणार आहे हे आपले भाग्यच आहे असे ते म्हणाले.
प्रभू रामचंद्रांचे मंदिर जन्मभूमी असलेल्या अयोध्येत व्हावे यासाठी अनेकांनी कष्ट सोसले आहे,आपल्या प्राणांची आहुती दिली आहे,त्यामुळे अयोध्या हे आगळे वेगळे तीर्थक्षेत्र या भारतभूमीत साकार झालेले आपल्याला दिसेल अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली
तर दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी गुढ्या तोरणे,ध्वज घरा समोर उभारून घरातच प्रतिमा पूजन करून सायंकाळी घरांमध्ये दिवाळीसारखा दिपोत्सव करून हा आनंद सर्वांनी साजरा करावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले.
COMMENTS