वेब टीम : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून आपण सरकार बनवू असा प्रस्...
वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नाही.
शिवसेनेला दूर ठेवून आपण सरकार बनवू असा प्रस्ताव भाजपनेच दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची राज्यातील सरकारं अस्थिर करण्याचे भाजपचे ’ऑपरेशन कमळ’ चालणार नाही.मुख्यमंत्र्यांनी तीन पक्षांत चांगला संवाद ठेवला तर कोणतेही ऑपरेशन फोल ठरेल व हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनासाठी कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पवार यांच्या मुलाखतीचा तिसरा व अंतिम भाग काल प्रकाशित झाला.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजपबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता व नंतर माघार घेतल्याचा गौप्यस्फोट मध्यंतरी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केला होता.
शरद पवार यांनी याचा सपशेल इन्कार करताना भाजपनेच आपल्याला तीन वेळा प्रस्ताव दिला होता व आपण त्याला नकार दिल्याचे सांगितले.
भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापनेबाबत आम्ही कधीच चर्चा केली नाही. प्रस्ताव घेऊन भाजपचे नेतेच अनेकदा चर्चेला आले होते.
शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या, असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते.
माझ्याशीही बोलले, एकदा नाही तर तीनदा बोलले. पंतप्रधानांशी माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे त्यांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी असाही निरोप आला होता.
तो निरोप आल्यानंतर आपल्या भूमिकेबद्दल चुकीची माहिती जाऊ नये मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो. संसद भवनातील त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही.
जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते, असे पवार यांनी स्पष्ट केले.
देवेन्द्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देताना, त्यावेळी कुठे होते हे मला माहीत नाही, असा टोला पवार यांनी लगावला. निर्णय प्रक्रियेत त्यांचं काय स्थान होतं ?
हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना माहीत झाले. त्याच्या आधी विरोधी पक्षातला जागरूक आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता;
पण राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला कधी जाणवलं नाही, असा चिमटा पवार यांनी काढला.
COMMENTS