वेब टीम : तिरुअनंतपुरम केरळ विभानसभेने सोमवारी तिरुअनंतपुरम विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या केंद्र...
वेब टीम : तिरुअनंतपुरम
केरळ विभानसभेने सोमवारी तिरुअनंतपुरम विमानतळाच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव संमत केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे कंत्राट अदानी समुहाला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.
मात्र आता याविरोधात केरळ सरकारने दंड थोपटले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारने फेरविचार करावा असं म्हटलं आहे.
राज्य सरकारने विमानतळाच्या कारभारातील काही वाटा अदानी समुहाला देण्याची तयारी दर्शवलेली असतानाही केंद्राने हे विमानतळ खासगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे विजयन यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नईथाला यांनीही राज्य सरकारच्या या ठरावाला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी राज्य सरकारचे धोरण हे दुतोंडी असल्याची टीका केली आहे.
एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक पद्धतीने अदानी समुहाला विरोध करते तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने त्यांना मदत करत असल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे.
तसेच या विमानतळाची देखभाल करण्यासाठी सीआयएएल म्हणजेच कोच्चीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची नियुक्ती का करण्यात आली नाही असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला आहे.
यामागे अदानी ग्रुपला पाठिंबा देण्याचा डाव असल्याची शक्यता रमेश यांनी व्यक्त केली आहे.
“राज्याचे हित लक्षात घेता आम्ही या ठरावाला पाठिंबा देत आहोत,” असं त्यांनी या ठरावाला पाठिंबा देताना सांगितलं आहे.
मात्र तरीही या विषयावर मुख्यमंत्री आपली बाजू मांडण्यासाठी उभे राहिले असता विरोधी पक्षाच्या बाकांवरील नेत्यांनी आवाज करुन आपला निषेध नोंदवल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
COMMENTS