वेब टीम : मुंबई चंद्रपूर जिल्हयातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासन आवश्यक निधी व सोई उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध...
वेब टीम : मुंबई
चंद्रपूर जिल्हयातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासन आवश्यक निधी व सोई उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टर्स व नर्सेस यांची थेट नियुक्ती करावी, इंजेक्शन्स व औषधांसंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही.
औषधे व इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करण्यात येईल. करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सर्व पदे राज्य सरकार तातडीने भरणार असून,
कोविड काळात काम करणाऱ्या डॉक्टर्स व परिचारिका यांना वाढीव प्रोत्साहन भत्ता देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार निश्चीतपणे विचार करेल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसह ऑनलाईन बैठक घेतली.
या बैठकीला खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले, अधिष्ठाता डॉ. मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राठोड उपस्थित होते.
बैठकीत मुनगंटीवार यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी जिल्हयातील रूग्णसंख्या १० हजार २३८ राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तेव्हा बेड मॉनीटरिंग सिस्टीम सॉफ्टवेअर तयार करण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आदींच्या जागा तातडीने भराव्यात.
अनेक एमबीबीएस डॉक्टर्स मानसेवी पध्दतीने सेवा देण्यास तयार आहे, त्यांच्या सेवा घेण्याची आवश्यकता आहे. सीपीएच्या दहा जागा त्वरीत भरण्यात याव्यात.
तसेच, सिपला कंपनीचे इंजेक्शन्स सुध्दा तातडीने उपलब्ध करण्यात यावे असेही म्हणाले. तसेच, ११ तालुके मानव विकास अंतर्गत येतात.
त्यामुळे प्रत्येकी १ कोटी निधी या तालुक्यांना उपलब्ध करणे गरजेचे आहे. ग्रामीण रूग्णालयांना विशेष निधी द्यावा, नागरिकांमधील भीती दूर व्हावी व त्यांच्यात सजगता निर्माण व्हावी यादृष्टीने जनजागरणाची मोहीम हाती घेण्याची मागणी केली.
शासकीय रूग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याची आवश्यकता आहे.
खनिज विकास निधीच्या माध्यमातुन सर्व ग्रामपंचायतींना नवीन पध्दतीचे ऑक्सीमीटर व थर्मामीटर देण्यात यावे.
तसेच जंतूनाशक फवारणी, फॉगींगसाठी सुध्दा खनिज विकास निधी अंतर्गत ग्राम पंचायतींना निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.
करोना संसर्ग बघता दिवसांचा प्रतिबंधात्मक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने आखावा व त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी देखील मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
कॅन्सर, मलेरीया, डेंग्यू, अस्थमा अशा इतर आजारांकडे दुर्लक्ष होवू नये याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली.
आमदार मुनगंटीवार यांनी सुचविल्याप्रमाणे बीएएमएस, एमबीबीएस डॉक्टर्स, नर्सेस यांची माहिती मागवून त्यांना थेट नियुक्ती देण्याचे निर्देश सुध्दा त्यांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
खासगी हॉस्पीटल्समधील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार आदींना विमा संरक्षण देण्याची मुनगंटीवार यांची सूचना रास्त असून याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
COMMENTS