गट-गणांच्या पुनर्रचनेमुळे सदस्यांची होणार पंचाईत ? पाच वर्षातील कामांवर फिरू शकते पाणी रचना आरक्षण सोडतीकडे इच्छूकांचे लक्ष तालुक्यात जिल्ह...
गट-गणांच्या पुनर्रचनेमुळे सदस्यांची होणार पंचाईत ?
पाच वर्षातील कामांवर फिरू शकते पाणी
रचना आरक्षण सोडतीकडे इच्छूकांचे लक्ष
तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढणार
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट, गणांची संख्या ही नगरपालिकेच्या धर्तीवर लोकसंख्येच्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे गट, गणात सदस्यांची संख्या वाढणार आहे. मात्र गट गणाची पुनर्रचना होणार असल्याने गेल्या पाच वर्षांत विद्यमान सदस्यांनी केलेल्या कामांवर पाणी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होणे बाकी आहे. सर्वाच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. पारनेर तालुक्यात एक गट दोन गण वाढणार आहेत. गटांची फेररचना जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांना कोठे शक्तीप्रदर्शन करायचे याचा अंदाज येईना. सध्या गटात ५५-६० व गणांत ३५-४० हजार मतदारसंख्या आहे. नव्याने होणाऱ्या गट व गणात ही संख्या प्रत्येकी ५-६ हजारांनी घटणार आहे. ही लोकसंख्या उत्तरेकडून पूर्वे कडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून दक्षिणेकडे अशी झीकझॅक (झेड) पध्दतीने सरकुन दक्षिण बाजूला नवीन गट निर्माण होईल. त्यात लोकसंख्येनुसार जे गाव मोठे असेल त्या गावाचे नाव गटाला दिले जाईल.
दुसरीकडे नवीन आरक्षणाचे भुत सदस्यांच्या डोक्यावर आहे. त्यातून दिलासा मिळाला तरी गट व गणात होणारया फोडतोडीमुळे पाच वर्षे सेवा करुनही हक्कांची गावं आणि हक्काचे मतदान तुटल्यास निवडणुकीत सदस्यांसमोर नवीन अडचण उभी राहणार आहे. गट, गण वाढविण्याच्या निर्णयानंतर निवडणूक आयोग अथवा ग्रामविकास विभागाकडून आद्याप कोणतेच मार्गदर्शन आलेले नाही. गट गणात मोठा बदल झाल्यास किंवा आरक्षण वेगळेच निघाल्यास ऐनवेळी अडचण नको म्हणून सर्वांचे आतापासूनच पर्यायी गट गणाची शोधाशोध सुरू आहे. यावेळी सर्व गट गण खूले होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
COMMENTS