वेब टीम : मुंबई आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणार्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला...
वेब टीम : मुंबई
आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणार्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करीत असून जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला.
शिर्डी येथे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री साई समाधीचे दर्शन घेतले. पत्रकारांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळाले. सरकारचे चांगले काम सुरु असल्यामुळेच जनतेने महायुतीला पाठबळ दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे निकाल नसतील. 220 जागांचे उद्दीष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
COMMENTS