वेब टीम : मुंबई गोरेगावमध्ये भाजपच्या कार्यसमिततीची बैठक सुरू आहे. या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपद गेल्याने नाराज...
वेब टीम : मुंबई
गोरेगावमध्ये भाजपच्या कार्यसमिततीची बैठक सुरू आहे. या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपद गेल्याने नाराज नसल्याचे स्पष्ट केले आणि नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दानवे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडीवर बोलताना काँग्रेसची चांगलीच खिल्ली उडवली.
दानवे म्हणाले की, 'मी शाळेत असताना सरपंच झालो. त्यावेळी ग्रामसेवक आले आणि म्हणाले ध्वजारोहण तुमच्य हस्ते करायचे आहे. त्यावेळी त्यांनी पांढरे कपडे घालण्याचा आदेश दिला. त्यासाठी नवा ड्रेस खरेदी केला पण तो मापात नव्हता. खरेदी केलेली नवी पँट ही उंचीपेक्षा जास्त होती. घरी आल्यावर घरच्यांना सांगितले. आईला सांगितल कमी कर, तर आईने बायकोला सांगायला सांगितले. बायकोनेही नकार दिला. त्यावेळी चुलतीकडे पाहिले तर तिनेही नकार दिला. शेवटी खोपट्यात पँट ठेवून दिली. त्यावेळी आपल पोरग सरपंच आहे आणि ते ध्वजारोहणासाठी जाणार आहे. आईच्या लक्षात येताच आईने पँटची उंची कमी करून दिली. आईनंतर बायको आणि काकूच्याही हेच लक्षात आल. त्यांनीही पँट कापली. शेवटी त्याचा बरमोडा झाला. कोणी कोणालाच न विचारता कापल्याने त्या पँटेचे बरमोडा झाला'. अशाच प्रकारे काँग्रेसचा बरमोडा झाला असल्याचे सांगत दानवे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
आज काँग्रेसची काय अवस्था झाली आहे पाहा. कोणी अध्यक्ष व्हायला तयार नाही. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी त्यांना महाराष्ट्रात ५-५ कार्याध्यक्ष नेमावी लागली आहेत. त्यांची अवस्था बर्मुडासारखी झाली आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा आज केंद्रीय मंत्री झाला आहे. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, काँग्रेसमध्ये नाही. कर्नाटक आणि गोव्यातील यांचे आमदार पक्ष सोडत आहेत. यांचे आमदार फुटले आणि ते दोष भाजपला देत आहेत.
अमित शहांनी सांगितले आहे की, विरोधी पक्षात जे चांगले आहेत. त्यांना पक्षात घ्या, त्यांना आपल्यासारखे करा, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी झटण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे पंतप्रधान असल्याचेही म्हटले.
COMMENTS