वेब टीम : मुंबई मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या महाजनादेश यात्रेवर आहेत व इथे मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक अशा भागांत निसर्गाने महाजन...
वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या महाजनादेश यात्रेवर आहेत व इथे मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक अशा भागांत निसर्गाने महाजनादेश दिला आहे, अशा शब्दात सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात :
या आठवड्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागाला पावसाने झोडपले हे खरे असले तरी तलाव क्षेत्र भरले व वाहू लागले हे महत्त्वाचे. पांडवकड्यासारखे दुर्दैवी प्रकार टळले असते तर बरे झाले असते. पावसाच्या तांडवाने घरादारांचे नुकसान झाले. महाजनादेश यात्रेवर असलेल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नुकसानीच्या बातम्या गेल्याच असतील. ते दयाळू आहेत. सगळ्यांचे सगळे ठीक होईल. निसर्ग कोपल्यावर नुकसान होते. पण रखरखीत दुष्काळापेक्षा कधी कधी प्रलय बरा वाटतो. आपत्कालीन व्यवस्थापन जागे असेल तर ‘हानी’ टळू शकते. कालच्या महाप्रलयाचा हाच संदेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या महाजनादेश यात्रेवर आहेत व इथे मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक अशा भागांत निसर्गाने महाजनादेश दिला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई मुसळधार पावसाने तुडुंब भरून वाहत आहे. कोकणातील सर्व नद्या, पुणे- नाशकातील धरणे भरून वाहत आहेत. हिंदुस्थानी हवामान खात्याने जे अंदाज व्यक्त केले ते या वर्षी खरे ठरले हे आश्चर्यच म्हणावे लागेल. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया वगैरे भागांत चांगला पाऊस झाला आहे. मराठवाड्यात कोठे पाऊस तर कोठे ‘सुके’ आहे. बीडमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. लातुरमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. राज्यात सगळीकडे पाणीच पाणी असताना बीड आणि लातुरकरांच्या डोळ्यांत मात्र पाऊस नसल्याने पाणी आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव अद्याप कोरडेच आहेत. तिकडे खान्देशात नंदुरबार, धुळ्यात रविवारी धुवाधार पावसाने झोडपून काढले, पण जळगावात मात्र त्या तुलनेत कमीच पाऊस झाला. मनमाड-नांदगावसारख्या भागात पाऊस या वेळीही चकवा देत आहे. सोलापूर जिल्ह्यातही पावसाने बऱ्याच भागात दडी मारली आहे. त्यामुळे कुठे महाप्रलय तर कुठे ‘रखरख’ कायम आहे. पावसाने मुंबईसारख्या शहराची दैना होते. कारण रेल्वे व्यवस्था कोलमडून पडते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रूळ पाण्याखाली जातात. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. सगळ्यात दुःखद बाब म्हणजे, अशा पावसात जाणारे बळी. नवी मुंबईच्या खारघर परिसरात
पावसाळ्यात वर्षासहलीस गेलेल्या
चार कॉलेज तरुणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. हे सर्व कॉलेज तरुण व तरुणी पालकांना अंधारात ठेवून, कॉलेजचा वर्ग बुडवून पांडवकड्याच्या धबधब्यावर गेले. हा धबधबा जोखमीचा आहे व येथे नेहमीच असे अपघात होत असल्याने पर्यटकांसाठी प्रवेशबंदी केली आहे. तरीही पर्यटक येथे येतात व जीव गमावतात. चार तरुणींच्या बाबतीत दुर्दैवाने तेच घडले. फालतू साहस जिवावर बेतते व शेवटी पालकांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी आकाश फाटते. पांडवकड्यात ज्यांची तरणीबांड पोरे वाहून गेली त्या कुटुंबांवर काय आघात झाला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. धबधबे हे धोकादायक आहेतच, पण खवळलेल्या नद्या आणि समुद्रात उतरणारे फाजील साहसवीरही जिवाशी खेळतात. अर्नाळा, अक्सा अशा समुद्रात उतरून पर्यटक प्राण गमावतात. अनेकदा हे पर्यटक नशेच्या अमलाखाली असतात. पोलिसांनी नक्की कोठे व कुणावर लक्ष ठेवायचे हादेखील एक प्रश्न येथे उभा राहतो. प्रत्येक वेळेला पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. खरे म्हणजे, अशा या बिकट परिस्थितीत अनेक गोष्टी सुरक्षित पार पडतात त्या पोलीस आणि प्रशासन यामुळेच. जलमय शहरात रबरी बोटी घेऊन पोलीस व महापालिकेचे लोक बचावकार्य करीत असतात. दिवसरात्र ते काम करतात. पाण्याचा उपसा करतात. लोकांना सुखरूप स्थळी हलवतात. पावसाचे हे असे थैमान सुरू झाल्यावर अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा
नागरिकांनीही आपली कर्तव्ये
पार पाडायची असतात. फक्त सरकार, प्रशासन व लोकप्रतिनिधींना अपराधी ठरवून काय होणार? समुद्राच्या दारात घुसून बांधलेल्या झोपड्या व घरे हे अतिक्रमण आहे असे आपल्याला का वाटू नये? या वेळी नॅशनल पार्कमध्ये महापूर आला. मुंबईत मिठी नदी, दहिसर नदीचे पाणी रस्त्यावर घुसले. मिठीच्या पात्रात घुसखोरी करणारे कोण आहेत? ऊठसूट नालेसफाईस दोष देणे हे काही लोकांचे कामच झाले आहे. नाल्यांवरही अतिक्रमण झाले आहे व ते दूर करणारे पालिकेचे कर्मचारी अनेकदा मार खातात. कर्जत भागातील रुळावर पाणी साचले. त्यात महालक्ष्मी एक्प्रेस अडकली. त्यातील प्रत्येक प्रवासी सुखरूपपणे बाहेर काढणारे प्रशासन व लोकप्रतिनिधीच हेते. आताही नगरसेवक, आमदार वगैरे लोक छातीभर पाण्यात उतरून लोकांना मदत करीत असतात. हे चित्र फक्त मुंबई व महाराष्ट्रात दिसू शकते. या आठवड्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागाला पावसाने झोडपले हे खरे असले तरी तलाव क्षेत्र भरले
COMMENTS