वेब टीम : दिल्ली नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यावर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या महासचिव प...
वेब टीम : दिल्ली
नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यावर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
सरकारचे काम अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे आहे.अर्थव्यवस्था म्हणजे कॉमेडी सर्कस नाही,असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला.
भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थे संबंधी चिंता व्यक्त केली होती.
भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे डळमळीत झाली आहे,असे ते म्हणाले होते.
भारतीय अर्थव्यवस्था लवकर सुधारेल अशी अपेक्षाही सध्याच्या उपलब्ध आकडेवारीतून व्यक्त करता येऊ शकत नाही,असे ते म्हणाले होते.
त्यावर बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे अर्थतज्ज्ञ आहेत,अशी टीका पीयूष गोयल यांनी केली होती.
प्रियांका गांधी यांनी ट्विट करत गोयल यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
भाजप नेते दुसऱ्यांचे योगदान नाकारण्याचे काम करत आहेत. त्यांनी इतरांचे योगदान नाकारण्यापेक्षा जनतेने जे काम सोपवलंय ते करावे.
नोबेल पुरस्कार विजेत्याने त्यांचे काम प्रामाणिकपणे केलंय. त्यामुळेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय.
अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळत आहे. अर्थव्यवस्था सांभाळणे तुमचे काम आहे, कॉमेडी सर्कस चालवणे नव्हे,असा टोला प्रियांका गांधी यांनी भाजपला लगावला आहे.
COMMENTS