वेब टीम : अहमदनगर शेतीच्या वादातून 50 ते 60 जणांच्या जमावाने शेतजमीनीत खड्डे खोदून जाण्या-येण्याचा रस्ता बंद केल्याची विचारणा केल्याचा ...
वेब टीम : अहमदनगर
शेतीच्या वादातून 50 ते 60 जणांच्या जमावाने शेतजमीनीत खड्डे खोदून जाण्या-येण्याचा रस्ता बंद केल्याची विचारणा केल्याचा राग येवून जातीवाचक अपशब्द वापरत मारहाण केल्याप्रकरणी या जमावावर अॅट्रासिटीचा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रविंद्र अशोक धाडे (वय 38, रा.रुईछत्तीशी) हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या शेतात कामासाठी गेले असता त्यांच्या शेतात 50 ते 60 इसम खड्डे करीत असताना दिसून आले.
त्याबाबत त्यांनी विचारणा केली असता जमावातील काही लोकांनी सांगितले की, या शेतजमीनीचे मालक अक्षय रमेश भळगट (रा.आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक) हे शेतजमीनीला कंपाऊंड करणार असून त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही हे खड्डे घेत आहोत.
त्यावर धाडे यांनी ‘ही जमीन आमची आहे तसेच या जमिनीला लावून वाटेफळ ते अंबिलवाडी असा रस्ता आहे हा रस्ता बंद करू नका’ असे म्हटले. याचा राग येवून जमावाने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी केली.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी रविंद्र धाडे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कायदा कलम 141, 142, 143, 146, 158, 441, 323, 504, 506 सह अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (एफ) (जी) (आर) (एस) 3 (1) (एफ) (जी) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस विभागीय अधिकारी पाटील हे करीत आहेत.
COMMENTS