वेब टीम : दिल्ली सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात उसळलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले. ‘नागरिक...
वेब टीम : दिल्ली
सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात उसळलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले. ‘नागरिकत्व कायद्यामुळे भारतातील कुठल्याही धर्माच्या नागरिकाचे नुकसान होणार नाही.
कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे या संदर्भातील अफवांना बळी पडू नका. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. शांतता राखा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले.
या कायद्यात नागरिकत्व देताना मुस्लिमांना वगळण्याची तरतूद आहे. त्यामुळे या कायद्यास विरोध होत आहे. ईशान्येकडच्या राज्यांनी सामाजिक समतोल बिघडण्याच्या भीतीने आंदोलन सुरू केले.
तर, जामिया मिलिया व अलीगड मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनांना हिंसक वळण लागले. या प्रश्नी विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज एका मागोमाग एक ट्विट केले.”हा हिंसाचार दु्र्दैवी आणि वेदनादायी आहे. वाद, चर्चा आणि विरोध हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, विरोध नोंदवण्यासाठी हिंसाचार करणे ही आपली परंपरा नाही.
नागरिकत्व कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने संमत केला आहे. देशातील बहुतेक पक्ष व त्यांच्या खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे.हा कायदा म्हणजे भारतीय संस्कृतीच्या स्वीकारार्हता, सौहार्द, करुणा व बंधुत्वाच्या मूल्यांचे प्रतीक आहे,’ असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले.
नागरिकत्व कायद्यामुळे भारतातील कुठल्याही धर्माच्या नागरिकाचे नुकसान होणार नाही. त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही. वर्षानुवर्षे छळ सहन करणाऱ्या व भारताशिवाय कुठलाही आधार नसलेल्या नागरिकांसाठी हा कायदा आहे,’ असे मोदींनी म्हटले.
भारतातील प्रत्येक गरीब, वंचित व शोषितांच्या सबलीकरणासाठी व देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कुणालाही आपल्यामध्ये फूट पाडू देऊ नका. चुकीच्या माहितीपासून व अफवा पसरविणाऱ्यांपासून सावध राहा,’ असा सल्लाही मोदींनी दिला.
COMMENTS