वेब टीम : दिल्ली विरोधकांकडून मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात येत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गरिबांच्या कल्याणासा...
वेब टीम : दिल्ली
विरोधकांकडून मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात येत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गरिबांच्या कल्याणासाठी, विकास योजनांसाठी आम्ही कधीही कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचा आगडोंब उसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत रामलीला मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकले.
सुधारित नागरिकत्व विधेयक गरिबांविरोधात असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. या कायद्यामुळे गरिबांचा हक्क हिरावून घेण्यात येणार असल्याचा अपप्रचार सुरू असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सुधारित नागरिकत्व आंदोलनाचा समाचार घेतला.
किमान खोटे बोलताना गरिबांवर दया करा, असे मोदी यांनी विरोधकांना म्हटले. अफवा पसरवणारे दोन प्रकारे लोक असून त्यातील एका गटाला अनेक दशके व्होट बँक मिळत होती आणि दुसऱ्या गटाला राजकीय फायदे मिळत होते. हे दोन्ही गट अफवा पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले.
आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. खोटी विधाने, फेक व्हिडीओ आणि चिथावणीखोर भाषणे यांनी दिली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करून स्फोटक वातावरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचे म्हणताना पंतप्रधानांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, दिल्लीतील लोकांना आम्ही अधिकार देत आहोत आणि आम्ही त्यांचा अधिकार हिसकावून घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. माझ्या कामाची पडताळणी करा. त्यात भेदभाव आढळल्यास देशासमोर मांडण्याचे आव्हान मोदींनी विरोधकांना दिले.
दिल्लीतील शेकडो अनधिकृत वस्त्यांना अधिकृत करण्यात येऊन सुमारे ४० लाख लोकांना अधिकार मिळाला. यामध्ये आम्ही कोणालाही धर्म, जात विचारली नसल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील दलित नेत्यांच्या भूमिकेवरही टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले की, ‘हा कायदा नेमका काय आहे, नेमकी दुरुस्ती काय आहे याचा अभ्यास न करता देशातील दलितांचे काही नेतेही या वादात पडले आहेत. ज्यांच्यावर शेजारी देशांमध्ये धार्मिक अत्याचार झाले अशांना संरक्षण देणारा हा कायदा आहे.
पाकिस्तानातून आलेले शरणार्थी हे अधिकतर दलित समाजाचे आहेत. आजही पाकिस्तानात दलितांना गुलामीचे जीवन जगावे लागत आहे. त्यांना चहासुद्धा कपासह विकत घ्यावा लागते. त्यांच्या मुलींवर अत्याचार होतात. त्यांच्याशी बळजबरीने लग्न केले जाते आणि बळजबरीने त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे मोदी म्हणाले.
COMMENTS