वेब टीम : अमरावती आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर झाले. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयका...
वेब टीम : अमरावती
आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर झाले. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर झाले होते.
आवाजी मतदानाने हे विधेयक सोमवारी मंजूर झाले. या विधेयकानुसार विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी, अमरावती विधीमंडळ तर कुरनूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल.
या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध झाला होता. यावरील चर्चेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई करत अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबितदेखील केले होते.
याविरोधात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन केले. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा त्यांची सुटका केली.
विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला. नायडू यांना जे हवं होतं तेच केल्याचे ते म्हणाले.
विकास केवळ एका स्थानापुरता मर्यादित नसावा, असे शिवरामकृष्ण समितीने सोपवलेल्या अहवालातून स्पष्ट केले होते. त्यांनी समितीच्या अहवालाची दखल घेतली नसल्याचे ही रेड्डी यावेळी म्हणाले.
काही आमदारांनी यावेळी जय अमरावतीची घोषणाबाजी केली.अध्यक्षांनी आमदारांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेबाहेर पायऱ्यांवर आंदोलन केले. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यापूर्वीही त्यांनी तीन राजधान्यांच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला होता. आज आंध्र प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जगातील कोणत्याही देशांमधील राज्यांना तीन राजधान्या नाहीत.आम्ही अमरावती आणि आंध्र प्रदेशला वाचवू इच्छितो,असे ही ते म्हणाले होते.
आम्ही राज्याची राजधानी बदलत नसून दोन नव्या राजधान्या जोडत असल्याचे रेड्डी म्हणाले.
COMMENTS