वेब टीम : दिल्ली भारत सरकारने कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या १४,८०० भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एक योजना आखली आ...
वेब टीम : दिल्ली
भारत सरकारने कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या १४,८०० भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एक योजना आखली आहे.
ही योजना ७ मे ते १३ मे दरम्यान ६३ उड्डाणे आखत अमंलात आणली जाऊ शकते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणांचे संचालन एअर इंडिया आणि त्यांची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस करणार आहे.
जे प्रवासी भारतात परततील त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
परदेशांत असणाऱ्या ज्या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे आढळणार नाहीत,
अशांना भारतात आणण्यात येईल, अशी घोषणा गृह मंत्रालयाने केलीय.
विमानांनी आणि नौसेनेच्या जहाजांद्वारे या नागरिकांना भारतात आणण्यात येणार आहे.
संयुक्त अरब अमीराती, ब्रिटन, अमेरिका, कतार, सौदी अरेब, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन्स, बांग्लादेश, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांतून भारतीयांना मायदेशात आणलं जाणार आहे.
भारतात करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे.
हे देशव्यापी लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात १७ मेपर्यंत वाढवण्यात आले. या दरम्यान इतर सर्व उड्डाणे बंद ठेवली आहेत.
यूएईसाठी १०, अमेरिका, ब्रिटन, बांग्लादेश, मलेशियासाठी प्रत्येकी ७ तसंच सौदी अरब, सिंगापूर, कुवैत, फिलिपिन्ससाठी प्रत्येकी ५ तर कतार, ओमान, बहरीनसाठी प्रत्येकी २ उड्डाणे आखण्यात येऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याद्वारे तब्बल १४,८०० भारतीय मायदेशी परतण्याची शक्यता आहे.
COMMENTS