वेब टीम : मुंबई महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्...
वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे.
इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे.
या वादळामुळे नासधूस होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे,
सर्व टीम्स अत्यावश्यक आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे.
नागरिकांनीदेखील घरातच राहणे हिताचे असून वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला थेट संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आपत्तीच्याप्रसंगी केंद्र सरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे.
या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी. वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एसडीआरएफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
COMMENTS