आमदार निलेश लंके १०२ कोटीच्या टँकर घोटाळ्याची लक्षवेधी मांडणार का ? वन विभागापेक्षाही तालुक्यात झाला मोठा घोटाळा लोक जागृती सामाजिक संस्थेच...
आमदार निलेश लंके १०२ कोटीच्या टँकर घोटाळ्याची लक्षवेधी मांडणार का ?
वन विभागापेक्षाही तालुक्यात झाला मोठा घोटाळा
लोक जागृती सामाजिक संस्थेची मागणी
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचे पाणीपुरवठा केल्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पोलिसांनी साई सहारा अॅण्ड इन्फ्रा फॅसिलीटी या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आमदार नीलेश लंके यांनी चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडण्याची मागणी लोकजागृती संस्थेने केली आहे.
याप्रकरणी लोकजागृती संस्थेचे रामदास घावटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपण सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात गुरूवारी आपल्या तालुक्यातील वन विभागातील भ्रष्टाचाराबाबत लक्षवेधी सूचना मांडली आहे, त्याबद्दल आपले आभार व अभिनंदन. आपण वन विभागातील गैरव्यवहाराला विधिमंडळात आज वाचा फोडली त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यात गेल्या चार पाच वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा टँकर घोटाळा उघड झालेला आहे. तसेच त्याबद्दल गुन्हाही आता दाखल झालेला आहे. परंतु पोलिस व संबंधित सरकारी यंत्रणा हा घोटाळा दडपण्याचा तयारीत आहे.
असे आम्हाला त्यांच्या हालचालीवरून निदर्शनास येत आहे. तरी आपण या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी चालू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबतची लक्षवेधी सूचना मांडावी अशी मागणी करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी या गावात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वास्तव्य आहे. अण्णांनी भ्रष्टाचारमुक्तीची मोठी मोहीम येथुनच सुरू केली आहे. असे असतांना, या तालुक्यात टँकर घोटाळा समोर आला आहे. त्यानंतर आता रेशन घोटाळा देखील समोर आला आहे. त्यामुळे
पारनेर भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी लोकजागृती संस्थेने पुढाकार घेतला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, याप्रकरणी आमदार नीलेश लंके यांनी लक्षवेधी मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई विभाग यांनी पारनेर येथील साई सहारा या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे गेली पाच वर्षे कंत्राट दिले होते. या कंपनीने पाणी पुरवठा करताना अनेक शासन नियमांचा भंग करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून शासनाची फसवणूक केली आहे. साई सहारा ही कंपनी राळेगण सिद्धी येथील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा माजी सचिव सुरेश पठारे, निघोज येथील मळगंगा डेअरी उद्योग समुहाचा सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके, अभय औटी, दादाभाऊ पठारे, नितीन अडसुळ, विठ्ठल गाजरे, विठ्ठल पवार यांच्या मालकीची आहे.
लोकजागृती संस्थेचे रविवारी आत्मक्लेश आंदोलन
पारनेर तालुक्यातील टँकर घोटाळा उघड झाला असून, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तरी देखील याप्रकरणी हे प्रकरण दडपण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रकरणी सदोष चौकशी होऊन संबंधितांना शिक्षा व्हावी, यासाठी लोकजागृती संस्थेकडून रविवारी २७ मार्च रोजी आत्मक्लेष आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रामदास घावटे यांनी दिली आहे.
COMMENTS