वेब टीम : मुंबई राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 4 हजार 11 नवीन शिक्षकांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियुक्त्या...
वेब टीम : मुंबई
राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 4 हजार 11 नवीन शिक्षकांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियुक्त्यांना अनियमितपणे मान्यता देण्यात आले असल्याची स्पष्ट कबुली शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषदेच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलीय. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले.
मे 2012 नंतर पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती, त्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची नवीन नियुक्त्या करू नयेत, असे शासनाचे आदेश होते. मात्र हे आदेश पायदळी तुडवत शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालकांच्या संगनमताने अनुदानितच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये 4 हजार 11 शिक्षकांच्या नियुक्त्यांना अनियमित मान्यता देण्यात आली असून यासाठी करण्यात आलेल्या चौकशीत 46 प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी दोषी असल्याचे आढळून आले हेाते. त्यांच्याविरोधात तत्कालिन शिक्षण आयुक्तांनी 13 प्राथमिकच्या आणि 33 माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे आहे काय, असा सवाल गाणार यांनी केला होता, त्यावरही शिक्षणमंत्र्यांनी हे अशंत: खरे असल्याची सांगत या प्रकरणी शासनाने चौकशी करून यासाठीच्या प्रस्तावावार कार्यवाही सुरू असल्याचेही लेखी उत्तरात म्हटले आहे.
शिक्षक भरतीला बंदी असताना शिक्षणाधिकारी-संस्थाचालंकांच्या संगनमताने 4 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आल्या. यासाठी शिक्षण आयुक्तांनी 46 शिक्षणाधिकार्यांवर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. या सर्व प्रकरणात मंत्रालयांतील अधिकार्यांपासून संस्थाचालक यांचे मोठे रॅकेट असल्याने या सर्व प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करावी अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली.
COMMENTS