वेब टीम : अहमदनगर नगर शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरात पाणी शिरले. या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यव...
वेब टीम : अहमदनगर
नगर शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरात पाणी शिरले. या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था कोलमडली. अनेक घरांमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. अनेक दुकानांतही पाणी गेले आहे. नगरमध्ये झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर गेला आहे. तर अनेकांच्या घरासमोर लावलेल्या गाड्या वाहून गेल्या.
गेल्या अनेक दिवसानंतर नगर शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी दीड तास झालेल्या पावसाने नगरमध्ये हाहाकार उडवला आहे. नगर शहरातील गुलमोहर रोड भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दुकानेही पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले चित्र पाहायला मिळाले. या परिस्थितीत महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था नेमकी कुठे गेली, हे समजायला तयार नाही.
मनपा आपत्ती व्यवस्थापनमधील एकही कर्मचारी या नागरिकांकडे फिरकला नाही. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महानगरपालिकेकडून पाणी उपसणे बाबत कोणतीच मदत न भेटल्याने नागरिक हतबल झालेले दिसत होते. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
निलक्रांती चौक, चितळे रोड, माळीवाडा, अमरधाम, नालेगाव परिसर, शनी चौक परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला होता. शहरात दुपारनंतर झालेल्या पावसामुळे अनेकांची चांगलीच धावपळ झाली.
दरम्यान नगर, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला.
COMMENTS