वेब टीम : पाथर्डी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या बहुतांश राजकीय पक्षांनी यात्रांचा धडाका लावला आहे. सत्ताधारी भारतीय ...
वेब टीम : पाथर्डी
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या बहुतांश राजकीय पक्षांनी यात्रांचा धडाका लावला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचीही महाजनादेश यात्रा सुरु आहे.
या यात्रेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा फायदा होणार नाही. त्यांची माजोरी व मुजोरी माहीत असल्याने जनता त्यांना थारा देणार नाहीत’ अशी टीका केली. त्याचबरोबर ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वासही व्यक्त केला.
महाजानदेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. ‘प्रत्येक यात्रेचे एक दैवत असते. माझ्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता आहे. आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे.
दोन्ही काँग्रेसच्या यात्रेकडे जनतेने पाठ फिरवली आहे. मात्र या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’ असा दावा त्यांनी केला. ‘पुढची २५ वर्षे भारतीय जनता पक्ष सत्तेतून हटणार नाही.
दोन्हीही काँग्रेसने त्यांनी केलेल्या चुकांबद्दल जनतेची माफी मागावी. त्यामुळे त्यांना थोडीफार मते तरी मिळतील,’ असंही ते म्हणाले.
देशात ईव्हीएम २००४ साली आले आणि २०१४ पर्यंत राज्यात व केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हते.
पण भाजप जिंकायला लागला की ईव्हीएम खराब कसे काय, असा सवाल त्यांनी केला. सुप्रिया सुळे जिंकल्या की ईव्हीएम खराब नाही.
पण सुजय विखे जिंकले तर ईव्हीएम खराब झाले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम हटवा मोहिमेवर केली.
COMMENTS