वेब टीम : अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये मी आमदार संग्रामभैया जगताप यांचा प्रचार केला म्हणजे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे नाही. मी ताल...
वेब टीम : अहमदनगर
लोकसभा निवडणुकीमध्ये मी आमदार संग्रामभैया जगताप यांचा प्रचार केला म्हणजे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे नाही. मी तालुक्यामध्ये जनशक्ती विकास आघाडी या संघटनेमार्फत गोरगरिबांची सेवा करते. मी अद्याप कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. चालू विधानसभेसाठी मी माझी योग्य भूमिका दिनांक १८ ऑगस्ट २०१९ च्या शेवगाव येथील मेळाव्यात जाहीर करील असे प्रतिपादन जनशक्तीच्या जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव येथील बैठकी दरम्यान केले.
आज शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकारणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ दादा गावडे, संजय आंधळे, भागवत रासनकर, सुरेश नाना चौधरी, देवराव दारकुंडे, प्रा. सोपानराव पुरनाळे, अशोक पातकळ, पंडितराव नेमाने, आबासाहेब राऊत, चांदभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ काकडे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनशक्ती विकास आघाडीची भूमिका घेणे गरजेचे होते. परंतु आमदार संग्राम भैया जगताप यांच्या व्यतिरिक्त पाठिंब्यासाठी कुणीही आमच्यापर्यंत संपर्क साधला नाही अथवा भेट घेतली नाही. माझ्याकडे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप स्वतः माजी कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना घेऊन आले होते. त्यावेळी पवार साहेबांच्या शेवगाव येथील सभेमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला व त्यांचा प्रामाणिकपणे प्रचारही केला.
पाठिंबा देणे व प्रचार करणे म्हणजे पक्षात प्रवेश नव्हे. त्यामुळे कोणीहि चुकीचा अर्थ त्याबाबत लावू नये. आम्ही जे राजकारण करतो ते अंधारात काही करत नाही सर्वांसमोर करतो. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने व त्यांच्या पाठबळामुळे मला चौथ्यांदा जिल्हा परिषदेत सर्वसामन्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्याची संधी मिळाली. जनशक्ती विकास आघाडी ही संघटना गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारी आहे.
त्या संघटनेमार्फत मी राजकारणापेक्षा समाजकारण करते. जनतेच्या पाठिंब्यावरच मी आजपर्यंत या क्षेत्रात टिकून आहे. सर्वसामान्य जनता हाच माझा पक्ष आहे. त्यामुळे येत्या विधानसभेसाठी माझी भूमिका मी दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या स्वराज मंगल कार्यालय येथे घेण्यात येणाऱ्या कार्यकर्ता मेळावा मध्ये मांडणार आहे असेही सौ काकडे बोलताना म्हणाल्या.
COMMENTS