वेब टीम : बीड परळी मतदार संघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून असतं. कारण हा मतदार संघ मुंडेंचा आहे. या मतदार संघातून मुंडे विरुध्द मुंडे ...
वेब टीम : बीड
परळी मतदार संघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून असतं. कारण हा मतदार संघ मुंडेंचा आहे. या मतदार संघातून मुंडे विरुध्द मुंडे अशी लढाई पहावयास मिळते.
गेल्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा पराभव पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केला होता. यावेळी ही दुरंगी लढत होणार यात काही शंका नाही.
निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन सुरु केले. मेळावे, सभांचा परळी मतदार संघात धुमधडाका सुरु आहे. बीड जिल्हयातला एकमेव मतदार संघ परळी आहे, तेथे दोन उमेदवारात टफ पहावयास मिळते.
दोन्ही उमेदवार मोठ्या ताकदीचे असल्याने सगळ्याचेच परळीकडे लक्ष असते. यावेळी परळीतून कोण बाजी मारील अशी चर्चा आता पासून रंगतांना दिसते.
परळी मतदार संघातूनच स्व. गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय जडणघडण झाली. या मतदार संघाचे नेतृत्व सध्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या करत आहेत. दोन टर्म पंकजा मुंडे या मतदार संघातून निवडून आल्या.
गेल्या वेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात सरळ लढत झाली होती. मात्र मोठ्या फरकाने पंकजा मुंडे ह्या विजयी झाल्या. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात भाजपाचे सरकार आल्याने या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना चांगले स्थान देण्यात आले. त्या राज्याच्या मंत्रीमंडळात असल्याने त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्या मतदार संघात मोठया प्रमाणात विकासाचे कामे केली.
पंकजा मुंडे यांना तोडीस तोड देण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत आहेत. धनंजय यांच्या ताब्यात नगर पालिका असल्याने त्यांनी ही शहराच्या विकासासाठी आपली ताकद लावली. परळी तालुक्यात कोणती ही निवडणुक असो, ती अगदी अटी-तटीची होते. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला राष्ट्रवादी, भाजपात प्रचंड रस्सीखेच पाहावयास मिळते.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला परळी मतदार संघात हार मानावी लागली. राष्ट्रवादीने बाजी मारुन भाजपाचे पानीपत केले होते. नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला परळी मतदार संघाने लीड दिली. जिल्हा परिषदेचं वारं लोकसभेत दिसून आलं नाही. आता विधानसभेला काय होतं? याकडे लक्ष लागून आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा आता पासून पणाला लावली. परळी मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाच्या वतीने मेळावे, सभा होत आहेत. पुन्हा एकदा मुंडे विरुध्द मुंडे अशी दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे. यात कोणाची बाजी असेल याकडे सगळ्याचेच लक्ष लागून राहणार आहे.
टी.पी.मुडेंमुळे परळीत कॉंग्रेसचं अस्तित्व( टी.पी) गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत कॉंग्रेसचा सफाया होत आहे. पुर्वीच्या आणि आजच्या कॉंग्रेसमध्ये खुपच फरक आहे. बीड जिल्हयात कॉंग्रेस नावालाच असून कॉंग्रेस मध्ये राहिले काही ठरावीक नेते मंडळीच, कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये दुष्काळ असतो.
परळीत टी.पी. मुंडे यांच्यामुळे कॉंग्रेसचं नाव आहे. जनतेच्या हक्कासाठी टी.पी आंदोलन करत असतात. त्यामुळे कॉंग्रेस काही प्रमाणात जिवंत असल्यासारखी वाटते. जिल्हयात कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे कॉंग्रेसला एक ही हक्काचा मतदार संघ निर्माण करता आला नाही.
१९९९ नंतर जिल्हयामध्ये एकदाही कॉंग्रेस पक्षाचा आमदार निवडून आला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत फक्त बोटावर मोजण्या इतके नगरसेवक आहेत, ते केज शहरात, इतर शहरात एक ही नाही.
एकीकाळी कॉंग्रेस पक्षाशिवाय पान हालत नव्हतं.. आज कॉंग्रेस शोधुन सापडेना गेलयं, इतकी वाईट अवस्था कॉग्रंेसची झाली.
COMMENTS