वेब टीम : मुंबई नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं बहुमत...
वेब टीम : मुंबई
नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं बहुमताच्या परीक्षेचा निर्णायक अडथळा शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) यशस्वीरित्या पार केला.
नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारवरील विश्वास ठराव बहुमताने जिंकला आहे.
महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता.
त्यानंतर महाविकास आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर पुढील सर्व सोपस्कार पार पडले. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.
राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीचं कामकाज आटोपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला.
त्याला सत्ताधारी बाकावरील आ. नवाब मलिक, जयंत पाटील व सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.
त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून गणती करण्यात आली. विश्वास ठरावाच्या बाजूनं 169 मतं पडली आणि हा ठराव उद्धव ठाकरे सरकारनं जिंकला. मनसे, एमआयएमसह चार सदस्यांनी तटस्थ भुमिका घेतली.
तत्पूर्वी, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीनं आपापल्या पक्षाच्या आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला होता.
ठाकरे मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूनं मतदान करण्याचे आदेश तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी आमदारांना दिले होते.
सभागृह सुरू होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांना धरून अधिवेशनाबद्दल काही आक्षेप घेतले. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीतानं का झाली नाही?, अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांचं समन्स आहे का?, असे प्रश्न उपस्थित केले.
हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांचे हे आक्षेप फेटाळून लावले. हे अधिवेशन नियमाला धरून आणि कायदेशीरच आहे, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
COMMENTS