वेब टीम : अहमदनगर नगर शहरामध्ये बुधवारी (दि.25) सकाळी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाका...
वेब टीम : अहमदनगर
नगर शहरामध्ये बुधवारी (दि.25) सकाळी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या भव्य मोर्चात राष्ट्रीय सायंसेवक, विश्व हिंदू परीषद, भाजप, शिवसेना आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गांधी मैदान येथून सुरवात झालेला हा मोर्चा चितळे रोड, चौपाटी कारंजा, जुने कोर्ट गल्ली, वाडियापार्क, बसस्थानक, पुना रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी झालेले नागरिक भारत माता कि जय…, वुई सपोर्ट सी.ए.ए., अशा जोरदार घोषणा देत होते. शेकोडो नागरिकांनी तिरंगा ध्वज व घोषवाक्याचे फलक हातात घेतले होते. शांतेत व शिस्तीत हा मोर्चा मार्गस्थ झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी माजी आ.अनिल राठोड म्हणाले, स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर भारतात प्रथमच अत्यंत मोठे निर्णय घेतले जात आहे. काश्मीर प्रश्न, राम मंदिर व आता या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी होत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आता या कायद्यामुळे पूर्ण होणार आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या कायद्याचे समर्थन करावे व देश विघातक शक्तींना विरोध करावा.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर आत्तापर्यंत कोणीही घेतले नसतील, असे धाडसी निर्णय घेत आहेत. मात्र विरोधकांना हे सहन होत नाहीये, त्यांचा जळपापड झाला आहे. त्यामुळेच देशात अशांतता पसरवत दंगल घडून आणत आहेत.
खा.सुजय विखे म्हणाले, भारतीय नागरिक या कायद्याचे समर्थन करत आहेत. जे हिंसा करत दंगल घडून आणत आहेत ते खरे भारतीय नाहीत. ते घुसखोर आहेत. विरोधकांना या देशहिताच्या कायद्याचे ज्ञान कमी आहे. विरोधकांनी लोकसभेत व राज्यसभेत झालेल्या भाषणाचा अभ्यास करावा. या कायद्याचा गैरसमज दूर होण्यासाठी डिबेट होणे गरजेचे आहे.
रा.स्व.संघाचे प्रांत संपर्कप्रमुख राजाभाऊ मुळे म्हणाले, महात्मा गांधी यांनी देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच या कायद्याची मागणी केली होती. तसेच 2003 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे या कायद्याची मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी सुरु केली असल्याने देशात परिवर्तनाची नांदी झाली आहे.
उपमहापौर मालन धोणे, काँग्रेसचे धनंजय जाधव, चंद्रकांत काळोखे यांनीही या कायद्याच्या समर्थनार्थ भाषणे केली. सभेचे सूत्रसंचलन सचीन राऊत यांनी केले. आभार रुद्रेश आंबाडे यांनी आभार मानले. यावेळी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर, शांतीभाई चंदे, माजी खासदार दिलीप गांधी, वसंत लोढा, भाजप जिल्हध्यक्ष भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी आदींसह भाजप, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS