वेब टीम : मुंबई कृषी पंपांसाठीचे मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ...
वेब टीम : मुंबई
कृषी पंपांसाठीचे मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी प्रशासनाला दिल्या.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
मार्च २०१८पर्यंत सुमारे ५० हजार कृषीपंपधारकांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरलेले आहेत,
तर सुमारे दीड लाख कृषी पंपधारकांनी नवीन वीज जोडणीसाठी रितसर अर्ज भरलेले असून त्यावर धोरणाअभावी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
याबाबत राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असून विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण ठरवण्याची मागणी करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने डॉ. नितीन राऊत यांनी या विषयावर धोरण प्रस्तावित करण्याच्या सूचना विभागाला दिल्या होत्या.
प्रस्तावित धोरणामध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्यांना लघुदाब वाहिनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषी पंपांना उच्च दाब प्रणालीवरून वीज जोडणी प्रस्तावित केली आहे.
याशिवाय ६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषी पंपधारकांना सौरऊर्जा संयंत्र पुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे.
एकाच वेळी पारंपरिक व सौरऊर्जा या अपारंपरिक स्रोताद्वारे वीज जोडणी प्रस्तावित आहे.
तसेच अशी नवीन जोडणी करताना कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग तसेच अन्य विभागाशी समन्वय करून हे धोरण सर्वंकष कसे होऊ शकेल,
याबाबत संबंधित विभागाशी सल्लामसलत करून धोरण अंतिम करावे व तसेच आवश्यकतेनुसार, सर्व संबंधित विभागांसह क्षेत्रीय स्तरावर संबंधित विभागांसमवेत समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या.
COMMENTS