वेब टीम : मुंबई विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर भाषण करायला उभे झाल्यानंतर विधानसभे...
वेब टीम : मुंबई
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवर भाषण करायला उभे झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जास्तीचा वेळ मागितली व राज्यातील कोरोनाच्या स्थितीवरून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
“राज्य सरकार कोरोनाबाबत अजिबात गंभीर नाही. कोविड काळात सरकारला उत्तम काम करता यावे म्हणून आम्ही संघर्ष केला नाही. जबाबदारीने वागलो.” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्यात मृत्युसंख्या वाढत आहे. नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई सर्वच ठिकाणची कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे.
ज्यांच्याजवळ १० लाख रुपयांचे बिल भरण्यासाठी पैसे आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा बेड मिळतो.
सामान्य लोकांना या सरकारने मरायला सोडून दिले आहे. कोरोनाच्या गंभीर स्थितीत खाजगी दवाखाने आपला व्यवसाय तेजीत करत आहेत.
रुग्णांकडून भरमसाट बिल आकारणे, सामान्यांना बेड नाही म्हणून वापस पाठवणे, अशी कृत्ये राज्यात सर्रास चालत आहेत.
तरीही राज्य सरकार यावर बोलायला तयार नाही. कोविड, वादळ, महापूर या विषयांवर सरकार बोलत नाही, अशा तीव्र शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
राज्यातील कोरोना मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. राज्य सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले.
हे अपयश झाकण्यासाठी सरकारने आकडेवारी लपवली; मात्र, कोरोना मृतांचे आकडे लपवणे हा कोरोनावर उपाय नाही, असेही फडणवीस म्हणाले.
COMMENTS