वेब टीम : मुंबई राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपच्या मंदिरे उघडा या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्त्वाचा विसर पडला का म...
वेब टीम : मुंबई
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपच्या मंदिरे उघडा या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्त्वाचा विसर पडला का म्हणणे आता फारच वादाचे कारण बनले आहे.
राज्यपालांच्या या पत्रावरून विरोधकांनी राज्यपालांना चांगलेच चिमटीत पकडले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना संविधानाची प्रत भेट दिल्य़ानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानाचा औचित्यभंग केला आहे.
त्यांच्याकडून राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप सुरु आहे.
त्यांच्याकडून संविधानाचा आणखी उपमर्द घडण्यापूर्वी राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (माकप) करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी पत्र लिहले होते.
यामध्ये राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्त्वाचा दाखला देत मंदिरे उघडावीत, असे सुचवले होते.
राज्यपालांच्या या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर माकपने पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.
ज्या संविधानाची शपथ घेऊनच आपण हे संविधानिक पदग्रहण केले आहे, यांचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो.
हा सल्ला जनतेच्या भल्यासाठी नसून त्यामागे खोडसाळ राजकीय उद्दिष्ट आहे, हे स्पष्ट आहे.
असा सल्ला आणि त्यासाठी वापरलेली अशोभनीय भाषा राज्यपाल पदाचे अवमूल्यन करणारी आहे, असे माकपने म्हटले आहे.
तसेच राज्यपाल महोदय राज्याच्या राजकारणात नसता हस्तक्षेप करू लागले आहेत, याविषयी संशयाला जागाही राहिलेली नाही.
परिणामी विद्यमान राज्यपाल महोदय हे राज्याच्या आरोग्याला हानिकारक बनले आहेत, असे ‘माकप’ला नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
आपल्या अशोभनीय राजकीय हस्तक्षेपामुळे आपल्या राष्ट्रपतींवर राज्यपालांनी दुर्धर प्रसंग आणला आहे.
त्यामुळे राष्ट्रपतींनी संविधानाची अवहेलना थांबवण्यासाठी राज्यपाल महोदयांना त्वरित पायउतार करावे, अशी मागणी माकपने केली आहे.
संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ या पायाभूत तत्त्वाचा उपहास करून महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी संविधानाचा घोर औचित्यभंग केला आहे.
राज्याला महामारीने ग्रासलेले असताना मंदिरासारखी सार्वजनिक आणि हमखास गर्दीची ठिकाणे उघडण्याचा अनाठायी सल्ला राज्यपाल महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्राने दिला आहे.
असा घातक सल्ला देत असतानाच राज्यपाल महोदयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता या पायाभूत तत्त्वाची अवहेलना केली आहे. असा आरोपही माकपने पत्रातून केला आहे.
COMMENTS