अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभा ट्रस्टच्या राधा-कृष्ण मंदिरात आयोजन करण्यात आलेल्या अन्नकोट उत्सवात कोर...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभा ट्रस्टच्या राधा-कृष्ण मंदिरात आयोजन करण्यात आलेल्या अन्नकोट उत्सवात कोरोनाच्या संकटकाळात गोर-गरीब गरजू भुकेल्यांना अन्न पुरविणार्या संस्थांचा गौरव करण्यात आला.
काकाशेठ नय्यर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, गुलशन जग्गी, राजेंद्र कंत्रोड, सुभाष जग्गी, प्रदीप पंजाबी, राजीव बिंद्रा, संजय धुप्पड, महेश मध्यान, जनक आहूजा, हरजितसिंह वधवा, अजय पंजाबी, रविंद्र नारंग, किरन वीजन, वीरेंद्र ओबेरॉय, प्रीतपालसिंह धुप्पड, पंडित मुन्ना शर्मा आदींसह शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात राकेश गुप्ता यांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे गोवर्धन गोकुळवासींनी वेगवेगळे खाद्य पदार्थ, व्यंजने बनवून गोवर्धन पर्वताची पूजा केली. तर 56 भोगाचे नैवेद्य दाखविले. सर्वांनी मिळून एकाच पंक्तीमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रसाद ग्रहण केले. याप्रमाणे समाजात कोरोनारुपी राक्षसाशी लढा देताना समाजातील अनेक संस्था व सेवादार पुढे येऊन त्यांनी टाळेबंदीत गरजू घटकांना दोन वेळचे जेवण दिले. कोणत्याही प्रकारे जात, पंथ, धर्म हा भेद न ठेवता माणुसकीच्या भावनेने मदत देण्यात आली. या कार्यातून मनुष्यरुपी ईश्वराची सेवा घडल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कोरोनाच्या संकटकाळात गोर-गरीब गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविल्याबद्दल सेवाप्रीत सोशल फाऊंडेशन, समर्पण ग्रुप, पंजाबी सेवा समिती, लालटाकी लंगर सेवा समिती, भाई दयासिंह गुरुद्वारा, जी.एम.डी. ग्रुप, घर घर लंगर सेवा ग्रुपचा गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक योगदानाबद्दल ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्व.गुलशन धुप्पड यांच्या वतीने विमलादेवी धुप्पड यांचा तर पंजाबी समाजाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रदीप पंजाबी यांचा सत्कार करण्यात आला. चड्डा परिवाराने मागील चाळीस वर्षापासून मंदिरात दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल बिशनदास चड्डा व विरावाली चड्डा यांचा देखील सत्कार करण्यात आला. सत्कामुर्तींना शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
काकाशेठ नय्यर म्हणाले की, समाज एकत्र आल्यास विकास साधला जाऊन, विधायक कामे मार्गी लागतात. समाजाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. समाज संघटित झाल्यास मोठे कार्य उभे राहून प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुलशन जग्गी यांनी समाजाच्या दुःखात सहभागी होऊन गरजूंना मदत करणे हा खरा धर्म आहे. माणुसकीच्या भावनेने जीवावर उदार होऊन गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविणार्या सामाजिक संस्थांचे कार्य प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तींचा गौरव होणे गरजेचे असून, कोरोना काळात शीख, पंजाबी, सिंधी समाजाने गरजूंना मदत देऊन एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी हरजितसिंह वधवा व जागृती ओबेरॉय यांनी कोरोना काळात राबविण्यात आलेल्या कार्याची माहिती देऊन वंचितांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार असल्याचे सांगितले.
राधा-कृष्ण मंदिरात अन्नकोट महोत्सवासाठी भाविकांनी विविध खाद्य पदार्थ आनले होते. 56 भोगच्या अन्नपदार्थाची मंदिरात आकर्षक पध्दतीने सजावट करुन ठेवण्यात आले होते. पारंपारिक पध्दतीने या सर्व अन्न पदार्थाचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जग्गी यांनी केले. आभार संजय धुप्पड यांनी मानले.
COMMENTS