अहमदनगर : प्रतिनिधी जिल्हा रुग्णायतील आग प्रकरणी बड्या अधिकाऱ्यांना सोडून सामान्य कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ स्मायलि...
अहमदनगर : प्रतिनिधी
जिल्हा रुग्णायतील आग प्रकरणी बड्या अधिकाऱ्यांना सोडून सामान्य कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना मैदानात उतरली आहे. खऱ्या अर्थाने या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेतर्फे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे एक दिवसाचे अन्न त्याग आंदोलन करण्यात आले.
रुग्णालयातील आग प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील तीन कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करताना बड्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची शंका व्यक्त करून हे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यासंबंधी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल म्हणाले की शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांच्याबद्दल वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यावर मंत्री तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असती तर लोकांना जीव गमवावा लागला नसता. अहमदनगरचे जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळ नसतो भरीत भर म्हणजे पालकमंत्री हे पाहुण्याप्रमाणे कधी तरी येतात; त्यामुळे प्रशासनात मनमानी कारभार आहे. सरकारने काही तरी कार्यवाही दाखवायची म्हणून परिचारिकांना अटक केली; परंतु शल्यचिकित्सक आणि इतर आरोपी मोकाट आहेत. महिला परिचारिकांवर कार्यवाही म्हणजे चोर सोडून संन्याशाला शिक्षा असा प्रकार आहे. बांधकाम अधिक्षक यांना सुध्दा आरोपी केले पाहिजे,कारण बांधकामातील तृटी. बांधकाम अधिकारी फक्त ठेकेदारांना भेटतात. सोबतच महावितरणचे अधीक्षक हे सुद्धा जबाबदारी झटकत खाजगी रुग्णालये जपत आहेत.शासकीय रूग्णालयाच्या उच्च दाबाच्या एक्स्प्रेस वीज जोडणी तारा समोरील महाविद्यालयाच्या प्रांगणातून आल्या आहेत. जर पुढे काही दुर्घटना झाली तर अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागू शकतो. त्याची दुरूस्ती होत नाही, सरकारने या आठवड्यात योग्य कार्यवाही न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असेही तोडमल यांनी सांगितले.
यावेळी शुभम बंब म्हणाले की, केंद्र सरकारने पीएम केअरमधून दिलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जाची चौकशी करून हे व्हेंटिलेटर आणखी किती ठिकाणी दिले आहेत याची चौकशी केली पाहिजे. रूद्र प्रतिष्ठानचे निखिल शिंदे म्हणाले, की आरोग्य विभागाची कसून चौकशी करून आरोपींना दोन दिवसांत अटक झाली पाहिजे. अभिजित दरेकर यांनी सांगितले की अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आग व्यवस्थापन नाही. शिवाय फायर ऑडिट झालेले नसून लोकांना अनेक ठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडून हिणकस वागणूक दिली जाते, यावर आता मोठे आंदोलन सुरू करणार आहोत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सिध्दार्थ सांगळे,विशाल आसलकर,गणेश दातरंगे, योगेश्वर गागरे, गणेश चव्हाण, संभाजी कदम, सागर कराळे महेश कांबळे आदी दिवसभर स्मारकात अन्नत्याग करत बसले होते.