अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) पहाडावर असलेल्या सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान हजरत सय्यद इसहाक शहा उर्फ मिरावली बाबांच्या दर्गाचा ...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
कापूरवाडी (ता. नगर) पहाडावर असलेल्या सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान हजरत सय्यद इसहाक शहा उर्फ मिरावली बाबांच्या दर्गाचा संदल, उरुस सोहळा मंगळवारी 16 नोव्हेंबर व बुधवारी 17 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडणार आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर हा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरा होत आहे. यावेळी कव्वाली, लंगर (भंडारा) आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खादीम ए खास, वंशावळ विश्वस्त असलेले मुजावर साहेबान अन्सार जहागीरदार यांनी दिली.
मिरावली बाबांच्या संदल, उरुसनिमित्त संपुर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनास येत असतात. दर्गाला साडेपाचशे वर्षाचा इतिहास असून, सर्व धर्मिय भाविक येथे एकत्र पहावयास मिळतात. धार्मिक एकतेचे प्रतिक म्हणून या धार्मिक स्थळाकडे पाहिले जाते. आजही मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनास येतात. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे दर्गा बंद असल्याने हा सोहळा मुजावर यांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने पार पडला. राज्य सरकारने दर्गा खुल्या केल्या असल्याने यावर्षी भाविक उत्साहाने दर्शनास हजर राहू शकणार आहेत. या संदल-ऊरुस कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मिरावली बाबा दर्गा ट्रस्ट कमिटी व मुजावरच्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा ही साधू संतांची पावनभूमी आहे. सर्व धर्माचे संत मंडळी ह्या जिल्ह्यात होऊन गेले. संत ज्ञानेश्वर ते संत शेख मोहंमद महाराजांचा इतिहास सांगणारा हा जिल्हा आहे. जिल्ह्यात संत मंडळीमध्ये मिरावली बाबा हे एक तेजस्वी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. कापूरवाडीच्या पहाडावर पांढर्या रंगाचे घुमट असलेली त्यांची दर्गा आहे. अनेक भाविक मनोभावे दर्शनास पहाडवर येत असतात. या वर्षी संदल-ऊरुस निमित्त भाविकांच्या सोयीसाठी उत्तमप्रकारे नियोजन करण्यात आले असल्याचे साहेबान जहागीरदार यांनी म्हंटले आहे.
COMMENTS