'मुळा'त १७ हजार दलघफू पाणीसाठा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; आवक सुरूच नगर प्रतिनिधी : मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर...
'मुळा'त १७ हजार दलघफू पाणीसाठा
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; आवक सुरूच
नगर प्रतिनिधी :
मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर कमी झाला असला तरीही, धरण पाणलोट क्षेत्रात नवीन जमा होणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. दरम्यान, धरण साठा १७ हजार १ दलघफू (६५.४२ टक्के) झाला आहे. धरणात ५,३२७ क्यूसेक प्रवाहाने आवकेत घट झाली आहे. वाढलेला पाणीसाठा समाधानकारक असल्याचे चित्र दिसत आहे.
मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड, पांजरे, कोतूळ परिसरात सलग दोन दिवसांपासून आषाढी सरींचा वर्षाव वाढला होता. परिणामी धरणाकडे नवीन पाण्याची आवक वाढली असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दरम्यान, मुळाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पावसाने दडी मारली आहे. मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ६ वाजता धरण साठा १६ हजार ६७० दलघफू नोंदविण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये नवीन पाण्याची आवक ६ हजार ५९२ क्यूसेक होती. दिवसभर पावसाचा वर्षाव कमी झाल्याने सायंकाळी आवक घटली. धरणाकडे मुळाच्या पाणलोट क्षेत्रातील कोतूळ सरिता मापन केंद्र येथून ५ हजार ३२७ क्यूसेक इतक्या प्रवाहाने नवीन पाणी धरणात जमा होत होते.
तर धरण भरेल !
मान्सून प्रारंभापासून धरण साठ्यामध्ये एकूण हजार ८ ७८० दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे. धरणामध्ये अजून ९ हजार दलघफू पाणी नव्याने जमा झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा आहे. आषाढ सरींप्रमाणेच श्रावण सरी बरसल्यास धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
COMMENTS