वेब टीम : मुंबई शिवसेनेने आजपर्यंत अनेक वादळे अंगावर घेतली. शिवसेनेचा जन्मच लढण्यासाठी झाला आहे. आम्हाला संघर्ष नवा नाही; पण प्रत्येक गोष्टी...
वेब टीम : मुंबई
शिवसेनेने आजपर्यंत अनेक वादळे अंगावर घेतली. शिवसेनेचा जन्मच लढण्यासाठी झाला आहे. आम्हाला संघर्ष नवा नाही; पण प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात का जायला लावत आहात, हिंमत असेल तर मैदानात या, आम्ही तयार आहोत, होऊन जाऊ दे काय ते, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी शिंदे गटाला दिले.
आम्ही अनेक वादळे थोपवली आहेत, आता तर वादळं निर्माण करणारे शरद पवारही आमच्यासोबत आहेत, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, फारुख अब्दु्ल्ला, गीतकार जावेद अख्तर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आले होते.
पण काही कारणांमुळे ते उपस्थित राहिले नाहीत. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय साठमारीवर जोरदार टीका केली.
शरद पवारांनी भुजबळांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सुरुवातीच्या काळात भुजबळ भाजीविक्रीचा व्यवसाय करत होते. त्यावेळी मुकुंद ठकोजी पाटील, व्ही.डी. जुथे यांनी भुजबळ कुटुंबाला मदत केली होती. त्यांचे दुकान जाणार होते.
मात्र या दोघांनी ते दुकान वाचवले. त्यानंतर भुजबळ यांनी शिवसेनेचे नेतृत्व केले. महापौर झाले, आमदार झाले. त्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही त्यांनी विविध पदे भूषवली, भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधले, दिल्लीतील सर्वात उत्तम वास्तू बांधली. यासाठी एक रुपयादेखील खर्च होऊ दिला नाही, असेही पवार म्हणाले.
COMMENTS