अहमदनगर : DNALive24 नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे पा...
अहमदनगर : DNALive24
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे पावणे तीन लाख मतांनी विजयी झाले. खा. सुजय विखे पाटील यांना नगर तालुक्यात मिळालेले मताधिक्य हे महाघाडीमुळे मिळालेले नसून ते महायुती व् आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामुळेच मिळाले आहे. मताधिक्याबाबत आ. कर्डिले यांच्यावर आरोप करतांना त्यांनी तारतम्य बाळगावे अन्यथा तुमची पोलखोल करु असा खणखणीत इशारा महाआघाडीच्या नेत्यांना भाजपाचे नगर तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपा, शिवसेना व एनडीएतील घटक पक्षांतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व मतदारांनी तन, मन, धनाने काम केल्याने मोठे मताधिक्य मिळाले आहे. तसेच नगर तालुक्यात आ. शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, अॅड. अभय आगरकर यांच्या प्रयत्नामुळेच मोठे मताधिक्य मिळाले आहे. असे असतांना नगर तालुक्यातील महाआघाडीचे नेते खा. विखेंना मताधिक्य मिळाल्याचे श्रेय घेत आहे. हे हास्यास्पद असून मताधिक्याचा आणि महाआघाडीचा कुठलाही संबंध नसल्याचे तालुकाध्यक्ष भालसिंग यांनी सांगितले.
यापूर्वीही खासदार दिलीप गांधी यांना दक्षिण मतदारसंघात दोन लाख 9 हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे. मोदींच्या सुनामीमुळे डॉ. विखे पाटलांचे मताधिक्य वाढले आहे. आ. कर्डिले यांच्यावर टीका करुन औरंगाबादची पुनरावृत्ती करु नये असा सल्लाही भालसिंग यांनी दिला. तारतम्य बाळगून आरोप करावे, नाही तर आम्ही तुमची पोलखोल करु असा खणखणीत इशाराही भालसिंग यांनी महाआघाडीच्या नेत्यांना दिला. त्यांचा रोख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांच्याकडे होता.
देशात गत पाच वर्षापासून नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी भरभरून मतं दिले. एनडीएचे 352 खासदार निवडून दिले. नगर दक्षिणेमध्ये डॉ. सुजय विखेंनाही मोठे मताधिक्य दिले. लोकांनी मोदींकडे पाहून भाजपाला मतदान केले. आ. शिवाजी कर्डिले यांनी नगर-राहुरीमध्ये पूर्ण ताकदीने यंत्रणा राबविली. तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून यंत्रणा राबविली. बूथ निहाय काम केले. खा. विखेंना पडलेल्या मतांमध्ये महाआघाडीचा काडीचाही संबंध नाही. ना. राधाकृष्ण विखे पाटील समर्थक हे भाजपावासी झालेले आहेत. त्यामुळे त्या महाआघाडीच्या नेत्यांनेही महाआघाडीचा शब्द लावू नये. ही निवडणूक नगर तालुक्याची किंवा महाआघाडीची नव्हती ती लोकसभेची होती असा टोलाही भालसिंग यांनी लगावला.
COMMENTS