वेब टीम : अहमदनगर महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. नगर जिल्हा तर याबाबतीत अधिक भाग्यवान आहे. अनेक संतांचे आशिर्वाद आपल्याल...
वेब टीम : अहमदनगर
महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. नगर जिल्हा तर याबाबतीत अधिक भाग्यवान आहे. अनेक संतांचे आशिर्वाद आपल्याला लाभले आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार समाजासाठी नेहमीच चांगले काम करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आज नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक पायी प्रबोधन दिंडीने पंढरपूरला चालले आहेत. या दरम्यान ते ग्रामविकासाच्या योजना लोकापर्यंत पोहचवतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करणार आहेत. हे आदर्शवत काम खर्या अर्थाने पर्यावरण संवर्धनाचा जागर ठरेल. ग्रामसेवकांनी पंढरपुरला पोहचल्यानंतर विठुराया चरणी चांगल्या पावसासाठी प्रार्थना करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून ग्रामसेवकांची नगर ते पंढरपूर अशी पायी प्रबोधन दिंडी मंगळवारी नगर शहरातून मार्गस्थ झाली. नगर-सोलापूर महामार्गावर वाळूंज येथे अध्यक्षा विखे यांनी या दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते परिसरातील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ, सुनिल नागरे, अशोक नरसाळे, मंगेश पुंड, शितल पेरण-खाडे, रामदास डुबे, बाळासाहेब कडू, एकनाथ आंधळे, सुरेश मंडलिक, वाळूंजच्या सरपंच लता शेळमकर, प्रमिला दरेकर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, भाऊसाहेब रोहकले, महादेव शेळमकर आदी उपस्थित होते.
एकनाथ ढाकणे म्हणाले की, ग्रामसेवकांना आपले काम करताना अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी वारीच्या परंपरेत प्रत्येकाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे. याची अनुभूती मागील वर्षी या दिंडीत सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना आली. यासाठी ग्रामसेवकांची ही दिंडी आयोजित करताना समाज प्रबोधनही करण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, सेवा हमी कायदा, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, स्वच्छता अभियान, नरेगा योजना, शौचालय वापर, निर्मल ग्राम, अंधश्रध्दा निर्मूलन, व्याख्याने, भारूड, लघुपटाच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. पायी दिंडीदरम्यान थेट पंढरपूरपर्यंतच्या वाटेवर ठिकठिकाणी 11 हजार वृक्ष लागवड करण्याचे काम ग्रामसेवक करणार आहेत.
COMMENTS