वेब न्यूज : मुंबई नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक असून नागरिकांना सुरक्षित व मानकाप्रमाणे अन्नपदार्थ मिळ...
वेब न्यूज : मुंबई
नागरिकांच्या आरोग्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सदैव जागरुक असून नागरिकांना सुरक्षित व मानकाप्रमाणे अन्नपदार्थ मिळतील याची काळजी घेत आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर खटला दाखल करणे, न्यायनिर्णय करणे, दंड करणे, परवाना निलंबित करणे यासारखी कारवाई करण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सदस्य अमित देशमुख यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.रावल बोलत होते. श्री.रावल म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या लिंबू सरबतासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी व बर्फाचे नमूने घेतले असून 280 नमुन्यांपैकी 218 नमूने दूषित आढळून आले आहेत. तसेच उसाच्या रसासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या 303 नमुन्यांपैकी 268 नमुने व इतर बर्फाच्या 385 नमुन्यांपैकी 300 नमुने दूषित आढळून आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 1 एप्रिल ते 15 मे 2019 या कालावधीत मुंबईतील 8012 फेरीवाल्यांवर कारवाई करुन 21 हजार 463 किलो खाद्यपदार्थ, 36 हजार 54 लिटर सरबत व 1 लाख 16 हजार 823 किलो बर्फ जप्त करुन नष्ट करण्यात करण्यात आलेले आहेत. फेरीवाल्यांकडे दूषित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ नियमितपणे जप्त करुन नष्ट करण्याची कारवाई करण्यात आलेले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री मदन येरावार, आमदार सर्वश्री अजित पवार, संजय केळकर यांनीही सहभाग घेतला.
COMMENTS