वेब टीम : नाशिक भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक आजपासून (29 जून) नाशिकमध्ये सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष र...
वेब टीम : नाशिक
भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक आजपासून (29 जून) नाशिकमध्ये सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बैठकीचे उद्घाटन झाले. लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभाही जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री कोण, हे आमचं ठरलं असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री कुणाचा होईल, हे समजेल. संघटना आणि पदाधिकारी यांची बैठक होईल आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ठरेल. राज्यातील निवडणुकांमुळे प्रदेशाध्यक्ष निवडीला विलंब झाल्याचे दानवे यांनी सांगितले. महिलांचे 33 टक्के आरक्षण हे लोकसभेत मांडू, मात्र काही राजकारणी राजकारण करत आहे. पण जेव्हा हे बिल येईल तेव्हा बहुमताने मंजूर करू असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, नाशिक शहर सोयीचे आहे. म्हणून बैठक नाशिकला बोलावली. भाजप कार्यकर्ते काम करून इथपर्यंत आले आहे. देशातील सर्व महत्वाचे पक्ष एकत्र येऊन मोदींचा पराभव करण्याचे स्वप्न पाहिले होते.1971 नंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार देशात स्थापन झाले आहे. देशात फक्त काँग्रेसच सरकार चालवू शकते, असा समज काँग्रेसने केला होता, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
राजकारणात कधीच इच्छा पूर्ण होत नसते. मनात इच्छा घेऊन चला, आज नाहीतर उद्या पद मिळेल, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवं, ही भाजपची भूमिका आहे. सर्वात जास्त महिला या भाजपमधून निवडून आल्या आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठकेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राज्यभरातील सर्व महिला खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्षा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्या यांच्यासह सहाशेहून अधिक महिला पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि भाजप महिला मोर्चा प्रदेशाच्या अध्यक्षा माधवी नाईक यांची प्रमुख उपस्थिती आहे.
COMMENTS