वेब टीम : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यात एकरकमी परतफेड योज...
वेब टीम : मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्साची रक्कम भरण्यासाठी 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
“एक रक्कम परतफेड घटकामध्ये” ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम दीड लाखाच्या वर आहे, अशा शेतकऱ्यांना रुपये दीड लाखावरील त्यांच्या हिस्याची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज माफी देण्यात येते.
सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरुन त्यांना चालू खरीफ हंगामामध्ये पीककर्ज घेणे सुकर होईल असे आवाहन सहकारी मंत्री देशमुख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे 50 लाख खातेदारांना रुपये 24 हजार 310 कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यत सुमारे 44 लाख खातेदारांना 18 हजार 500 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
COMMENTS