वेब टीम : अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे, अशी माहिती पाल...
वेब टीम : अहमदनगर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे. माने यांच्यावर अविश्वास ठरावासाठी सोमवार दि 8 जुलै रोजी जिल्हा परिषदेमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात अंतर्गत संघर्षातून मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावर अविश्वास ठराव आणला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माने हे पालकमंत्री शिंदे यांचे शब्द प्रमाण मानतात. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे व इतर पदाधिकाऱ्यांची ते ऐकत नाही, अशा तक्रारी आहेत.
अपंग माजी सैनिकाच्या पत्नीचे बदलीवरून अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी आक्रमक पवित्रा घेत माने यांच्यावर अविश्वास ठरावासाठी 8 जुलै रोजी विशेष सभा बोलाविली आहे. दुसरीकडे माने यांच्यावर अविश्वास येऊ नये, यासाठी प्रा. राम शिंदे हे प्रयत्नशील आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, अशी माहिती दिली आहे. माने यांना सक्तीच्या रजेवर पाठवून जिल्हा परिषद सदस्यांचा राग शांत करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असू शकतो, असेही सांगितले जात आहे. उद्या होणाऱ्या विशेष सभेत सदस्य नेमकी काय भूमिका घेतात, माने यांच्यावर अविश्वास ठराव येतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS