वेब टीम : मुंबई विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्याप्रमाणेच आता कुलभूषण जाधव यांनाही सुखरूप मायदेशी परत आणावं, अशी मागणी शिवसेनेने केली...
वेब टीम : मुंबई
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्याप्रमाणेच आता कुलभूषण जाधव यांनाही सुखरूप मायदेशी परत आणावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी भूमिका मांडली आहे.
काय म्हटलेय सामनाच्या अग्रलेखात, वाचा सविस्तर :
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर हल्ले केले. आपल्या हवाई दलाचा वीर अभिनंदन पाकच्या हाती सापडला, पण आंतरराष्ट्रीय दबावांचा परिणाम व मोदी सरकारची भीती यामुळे अभिनंदनला पाकड्यांनी मुक्त केले. मग ते भाग्य कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना का मिळू नये? जाधव यांनी देशसेवा केलीच आहे व हिंदुस्थानचा सुपुत्र म्हणूनच पाकने त्यांना पकडून एकप्रकारे जुलूमच चालवला आहे. अभिनंदनची सहिसलामत सुटका झाली हा आनंदच आहे, पण कुलभूषण जाधवांची सुटका करून त्यांना सहिसलामत मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल. मोदी व शहा यांनी मनात आणले तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करावा लागेल, इतकेच आम्ही सांगू शकतो.
हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस तूर्त स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे ‘बूच’ लावले असा प्रचार सुरू आहे. हिंदुस्थानचा हा विजय असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दिवशी कुलभूषण जाधव हिंदुस्थानात परत येतील तो विजय दिवस मानता येईल. तसे काही झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने ‘व्हिएन्ना’ समझोत्याचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे हेगच्या न्यायालयाने मारले, पण हिंदुस्थानच्याही सर्वच मागण्या मान्य केल्याचे दिसत नाही. मृत्युदंडाच्या शिक्षेस स्थगिती दिली हे ठीक, पण पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी कैद्याने राहणे, खासकरून ज्याच्यावर हेरगिरीचा आरोप आहे, त्या कैद्याचा पाक तुरुंगातील प्रत्येक दिवस हा मृत्युदंडच असतो. हेग न्यायालयाने सुनावले आहे की, या संपूर्ण प्रकरणाची नव्याने ‘ट्रायल’ म्हणजे सुनावणी व्हावी. दुसरे असेही सांगितले की, जाधव यांना वकिलांना भेटण्याची परवानगी मिळावी. व्हिएन्ना करारानुसार तो जाधव यांचा अधिकार आहे. जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक करताना कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. हासुद्धा व्हिएन्ना कराराचा भंग आहे. व्हिएन्ना समझोत्यानुसार कलम 36 प्रमाणे जाधव यांना अटक करताना त्यांच्यावरील आरोपाची सूचना न देणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे. कायद्यासंदर्भात माहिती घेणे हा जाधव यांचा हक्क होता, पण त्यांना अंधारात ठेवले. कुलभूषण जाधव यांना 2016 साली बलुचिस्तानमधून पाक सैन्याने अटक केली. हेरगिरी व दहशतवादासारखे आरोप ठेवून पाक लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. त्या शिक्षेविरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने फाशीची सजा स्थगित केली व आमच्या इतर मागण्या साफ फेटाळून लावल्या. कलम 137 नुसार जाधव यांना पाक लष्करी न्यायालयाने सुनावलेली सजा रद्द करण्याची मागणी ‘हेग’च्या न्यायालयाने फेटाळून लावली. जाधव यांची लगेच मुक्तता करावी आणि सुरक्षित हिंदुस्थानात पाठवावे ही मागणीसुद्धा मान्य झाली नाही. हेगच्या न्यायालयाने एक समतोल निर्णय देण्याचा प्रयत्न केला, पण हा निर्णय पाकडे मानतील काय? पाकिस्तानात नागरी कायद्याचे राज्य नाही. तेथे एक तर लष्कराचाच कायदा चालतो नाहीतर आतंकवाद्यांचा हम करेसो कायदा चालतो. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या दृष्टीने शत्रू राष्ट्र हिंदुस्थानचे ‘एजंट’ आहेत व पाकिस्तानात दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी ते आले होते. पाकिस्तानसाठी जाधव यांच्यावरील आरोप सोयीचे आहेत. आतापर्यंत जाधव यांच्याप्रमाणे अनेकांना हिंदुस्थानचे ‘हेर’ ठरवून शिक्षा ठोठावण्यात आल्या. सरबजीत प्रकरण तर जगजाहीर आहे. जाधव यांचे प्रकरण उघड झाले, पण जाधव यांच्याप्रमाणे आणखी कितीजण पाक तुरुंगात सडत आहेत व कितीजणांना ठार केले असेल ते सांगता येत नाही. पाकिस्तानात कोणताही कायदा नसल्याने सरळ सरळ मानवाधिकाराचे उल्लंघन होत असते. लष्कराचा मार्शल लॉ व अतिरेक्यांचा ‘इस्लामी लॉ’ यामुळे पाकचा नरक बनला आहे. त्या नरकातून कुलभूषण जाधव यांना हिंदुस्थान कसे बाहेर काढणार? जाधव हे काही कसाब किंवा हाफीज सईद नाहीत. हाफीजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हा युनोच्या सुरक्षा परिषदेचा निर्णय आहे. जाधव यांना पाकच्या लष्कराने पकडले व आतंकवादी घोषित केले हा फरक आहे. पाकचे लष्कर त्यांच्याच देशाच्या पंतप्रधानांना फासावर लटकवते. बेनझीर भुत्तो यांचाही खून केला गेला. खून, अपहरण, लुटमार हा पाक लष्कराचा धंदाच झाला आहे. जाधव यांना मुक्त करण्यासाठी पाक लष्कराने खंडणी मागितली तरी आश्चर्य वाटायला नको. जाधव यांच्यासाठी हिंदुस्थान सरकार न्यायालयाची लढाई लढते आहे व हरीश साळवेंसारखे निष्णात वकील त्यासाठी दिले आ
COMMENTS